उत्तर प्रदेशात दुर्गापूजा मंडपाला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा दुर्दैवी मृत्यू ; ५२ जण रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील भदोही येथील एका दुर्गापूजा दरम्यान, एक दुर्दैवी घटना घडली आहे. याठिकाणी आलेल्या मंडपाला भीषण आग लागून तीन जणांचा मृत्यू झाल्याही घटना समोर आली आहे. मृतांमध्ये दोन मुलांचा आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. आग लागल्यानंतर जवळपास २० मिनिटांनी घटनास्थळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. यानंतरही बराचवेळ आग आटोक्यात आली नव्हती.
आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आग लागली तेव्हा आरती सुरू होती आणि मंडपात जवळपास १५० जण उपस्थित होते. आगीत होरपळलेल्या ५२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आगीत होरपळलेल्यांना तातडीने स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी एक असणाऱ्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.





