इतक्या वर्षात विकासासाठी आलेला पैसा लोकांपर्यंत न पोहोचता तो भ्रष्ट नेत्यांच्या तिजोरीत पोहोचला – पीएम मोदी

दिमापूर – कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचे ईशान्येसाठी धोरण आहे “मते मिळवा आणि मतदारांना विसरा’. दिल्लीतील कॉंग्रेस नेते नागालॅंडकडे ढुंकूनही पाहत नाहीत. कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या सरकारांनी त्यांच्या राजकारणात नागालॅंडच्या स्थिरतेला आणि समृद्धीला कधीच महत्त्व दिले नाही. इतक्या वर्षात राज्यात विकासासाठी आलेला सरकारचा पैसा लोकांपर्यंत न पोहोचता, तो भ्रष्ट नेत्यांच्या तिजोरीत पोहोचला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर केला.
नागालॅंड विधानसभेसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दीमापूर इथल्या सभेत मोदी बोलत होते. मोदी म्हणाले, नागालॅंडच्या सांस्कृतिक विविधतेने मी नेहमीच प्रभावित झालो आहे. नागालॅंडमध्ये विकासाची आणि आत्मविश्वासाची लाट आहे. ईशान्येच्या जलद विकासासाठी आम्ही रात्रंदिवस काम करत असल्यामुळे आज येथे भाजप-एनडीपीपी सरकारला मोठा पाठिंबा आहे. चुमुकेदिमा, दिमापूर, नागालॅंड येथे जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालॅंडच्या जनतेला कॉंग्रेसचे सत्य दाखवून दिले.
नागालॅंड विधानसभेत 60 जागा आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाने एक जागा बिनविरोध जिंकली आहे. तर 27 फेब्रुवारीला नागालॅंड राज्यातील 59 जागांसाठी मतदान होणार आहे. नागालॅंडमध्ये एकूण 13.09 लाख मतदार आहेत. नागालॅंड विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ 12 मार्च रोजी संपेल आणि त्या कालावधीपूर्वी नवीन विधानसभेची स्थापना करावी लागेल. नागालॅंड विधानसभेसाठी 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. नागालॅंडमध्ये एनडीपीपी-भाजप युती निवडणूक लढवत आहे.
मोदी म्हणाले की, कॉंग्रेसने दिल्लीतून रिमोट कंट्रोलने नागालॅंडचे सरकार चालवले. दिल्लीपासून दिमापूरपर्यंत त्यांनी कुटुंबवादाला प्राधान्य दिले होते, परंतु आमच्या सरकारने संपूर्ण ईशान्येसाठी दिल्ली सरकारची विचारसरणी बदलली आहे. कॉंग्रेसने ईशान्येला एटीएम मानले होते.





