Satara News : महाबळेश्वर, पाचगणीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर थांबा..! सातारा जिल्हा प्रशासनाने घेतलाय मोठा निर्णय

सातारा : आता पावसाळ्याला सुरुवात झालीय. त्यामुळे येथील पावसाचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही सातारा किंवा महाबळेश्वराला जायचा प्लान करत असाल तर सातारा जिल्हा प्रशासनाने वाढत्या पावसाच्या अनुषंगाने मोठा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. ज्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय त्या भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच काही पर्यटन स्थळांवर जाणाऱ्या पर्यटकांना देखील सावधगिरीची सूचना देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळ 19 ऑगस्टपर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
कोणते पर्यटन स्थळ बंद?
सातारा जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील खालील प्रमुख पर्यटन स्थळ 19 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत.
- अजिंक्यतारा किल्ला
- ठोसेघर धबधबा
- केळवली-सांडवली धबधबा
- वजराई धबधबा
- कास पुष्प पठार
- एकीव धबधबा
- कास तलाव
- बामणोली
- पंचकुंड धबधबा
- सडावाघापूर उलटा धबधबा
- ऊरुल घाट शिव मंदिर धबधबा
- रुद्रेश्वर देवालय धबधबा
- ओझर्डे धबधबा
- घाटमाथा धबधबा
- लिंगमळा धबधबा
महाबळेश्वर आणि पाचगणी प्रमाणे सातारा जिल्ह्यातील ही सर्व पर्यटन स्थळ देखील चांगलीच लोकप्रिय आहेत. विशेषत: पावसाळ्यात धबधब्याचा आनंद घेण्यासाठी इथं पर्यटकांची गर्दी होत असते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. पण, यामुळे सर्व खबरदारी घेऊन निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सातारा जिल्ह्यात जाणाऱ्या पर्यटकांची चांगलीच निराशा होणार आहे. त्याचबरोबर पर्यटनावर अवलंबून उद्योगांवरही परिणाम होणार आहे.





