Census 2027 – जनगणना 2027 दोन टप्प्यांमध्ये शासनाकडून राबविली जाणार असून पहिला टप्पा हा 16 मे ते 15 जून या दरम्यान होणार आहे. या कालावधीमध्ये प्रगणक त्यांना नेमून दिलेल्या गाव अथवा गावातील भागाला भेट देऊन प्रत्यक्ष घरगणना करणार आहेत. घरगणना करत असताना ते शासनाने ठरवून दिलेले 34 प्रश्न घरातील प्रमुख अथवा उपस्थित व्यक्तीला विचारुन ही माहिती जनगणना पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. तत्पूर्वी 1 मे 15 मे या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये census.gov.in/se या संकेतस्थळावर व्यक्ती स्वतः आपली व आपल्या कुटूंबाची माहिती भरु शकणार आहे. तद्नंतर जनगणना 2027 चा टप्पा दोन कार्यक्रम 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीत प्रत्यक्ष जनगणना केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली आहे. भारत सरकारकडून आगामी जनगणना 2027 साठी व्यापक तयारी सुरु करण्यात आली आहे. जनगणना ही देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय आणि सांख्यिकीय उपक्रमांपैकी एक असून ती शासनाच्या धोरणनिर्मिती आणि विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जनगणना 2027 चा उद्देश देशातील लोकसंख्येची अद्ययावत व अचूक माहिती संकलित करणे हा आहे. डिजिटल जनगणना ( संग्रहित छायाचित्र ) जनगणनेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर या प्रक्रियेत लोकसंख्येची सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्ये याबाबत माहिती गोळा केली जाईल. या आकडेवारीच्या आधारे केंद्र व राज्य सरकारांना विकास योजना तयार करणे, संसाधनांचे योग्य वाटप करणे आणि विविध क्षेत्रांतील पायाभूत सुविधा नियोजन करण्यास मदत होईल. या वेळी जनगणनेत डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यात येण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे माहिती संकलनाची प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक होईल. प्रशासनाकडून जय्यत तयारी जनगणना 2027 ही संपूर्णतः डिजीटल स्वरुपात असून प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली आहे. यामध्ये ग्रामीण भागासाठी तहसिलदार हे चार्ज अधिकारी असून शहरी भागासाठी मुख्याधिकारी हे चार्ज अधिकारी आहेत. सुमारे 5 हजार 500 प्रगणकांमार्फत सातारा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनगणना होणार आहे. सातारा जिल्ह्यासाठी प्रधान जनगणना अधिकारी जिल्हाधिकारी संतोष पाटील हे असून जिल्हा जनगणना अधिकारी हे निवासी उपजिल्हाधिकारी सातारा हे असणार आहेत.