Mithun Chakraborty : “वक्फ कायद्यावर राग असेल तर…”; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान, ममता बॅनर्जींना सुद्धा सुनावलं

Mithun Chakraborty – वक्फ कायद्यामध्ये तृणमूल काॅंग्रेसच्या नेत्यांच्या जमिनी असतील, तर त्यांनी न्यायालयात दाद मागावी. त्यासाठी गरीबांना लक्ष्य का केले जात आहे? मुर्शिदाबादमध्ये होत असलेला हिंसाचार अजिबात समर्थनीय नाही, असे भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटले आहे. मला या घटनांबद्दल अजिबात आश्चर्य वाटत नाही. इथे दररोज, दर महिन्याला काहीतरी घडतं. काही दिवसांपूर्वी पालकांना तुकडे करून मारण्यात आले होते, असेही चक्रवर्ती म्हणाले.
भीतीमुळे दंगली :
मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, वक्फ कायदा फक्त मुस्लिमांसाठी आहे. हा कायदा प्रामुख्याने मुस्लिम महिलांच्या हितासाठी बनवण्यात आला आहे. या कायद्यामुळे वक्फ जमिनीचा किती लोकांनी गैरवापर केला आहे हे उघड होईल. अनेकांनी वक्फच्या जमिनी विकत घेतल्या आणि भाड्याने दिल्या.
आता हे लोक एक प्रकारचे आरामाचे जिणे जगत आहेत. मुळात वक्फच्या संपत्तीमध्ये गरीब मुस्लिमांना हक्क द्या. आता या लोकांना भीती वाटतेय की, वक्फच्या जमिनी तर गेल्या; म्हणूनच ते दंगली भडकावत आहेत.
मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, दंगलखोरांना सातत्याने धर्मविरोधी चिथावणी दिली जात आहे. तुम्ही आम्हाला काय करू देणार नाही? मुस्लिम बांधवांननी वक्फ जमिनीबाबत निर्णय घ्यावेत. वक्फ जमिनीत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. जर हे बाहेर आले तर अनेक लोक उघड होतील.
ममता बॅनर्जींच्या आरोपांना मिथुनचे प्रत्युत्तर :
भाजपवर दंगली भडकवण्याच्या आरोपांवर मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, ममता बॅनर्जी प्रत्येक वेळी एकच गोष्ट बोलतात. रामनवमीच्या मिरवणुकीचे उदाहरण देताना ते म्हणाले की, दीड ते दोन लाख लोक उपस्थित असूनही एकही दगड मिरवणुकीच्या दिशेने उचलला गेला नाही.
जर भाजप दंगली घडवत असेल तर इथेही दंगली व्हायला हव्यात, मग ते का झाले नाही? मुर्शिदाबादमध्ये भाजप नाही तर दंगली कोण घडवत आहे, हे लोकांना चांगले माहिती आहे. पण आज भाजपला अनावश्यकपणे बदनाम केले जात आहे.





