मुंबई – चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारतीय शास्त्रज्ञांचे जगभरात कौतुक केले जात आहे. भारताने मोठी कामगिरी करत इतिहास घडवला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहचणार भारत जगातील पहिला देश बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ग्रीसचा दौरा आटोपून थेट इस्रोच्या शास्रज्ञांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोमध्ये बोलताना सर्व शास्रज्ञांचे अभिनंदन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाल्याचेही पाहायला मिळाले. मात्र चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी इव्हीएम मशीनबाबत शंका व्यक्त केली आहे.
निवडणूकीच्या काळामध्ये अनेकदा देशातील विरोधी पक्षांकडून इव्हीएम मशीनबाबत शंका व्यक्त केली जाते. यावेळी देखील जितेंद्र आव्हाड यांनी चांद्रयान-३ मिशनचा दाखला देत इव्हीएम मशीनवरून भाजपवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी केलेले ट्वीट विशेष चर्चेत आले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) करत लिहिले की, “भारतात बसून चांद्रयान चंद्रावर कसे उतरवायचे हे बटनांवर ठरवलं गेलं. आणि त्यात यशस्वी देखील झाले. मग EVM च्या मार्फत मतदान कोणाला करायचं हे ठरवणं काय अवघड आहे. जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकतं, तर EVM मशीन BJP ला मतदान करू शकतं. विषय फार सोपा आहे. समजून घेतला पाहिजे.” असं पोस्ट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया साइट ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर केली आहे. त्यांच्या या ट्वीटनंतर आता वाद वाढण्याची शक्यता आहे.
भारतात बसून चांद्रयान चंद्रावर कसे उतरवायचे हे बटनांवर ठरवलं गेलं. आणि त्यात यशस्वी देखिल झाले.
मग EVM च्या मार्फत मतदान कोणाला करायचं हे ठरवणं काय अवघड आहे. जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकतं, तर EVM मशीन BJP ला मतदान करू शकतं.
विषय फार सोपा आहे. समजून घेतला पाहिजे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 25, 2023
दरम्यान, चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी शास्त्रज्ञांची पंतप्रधान मोदींनी भेट घेतल्यानंतर मोठी घोषणा केली. चांद्रयान-3 चंद्रावर ज्याठिकाणी लँड झालं, त्या ठिकाणाला ‘शिवशक्ती पॉइंट’ असे नाव दिले जाणार आहे. तर, चांद्रयान-2 मधील लँडर ज्याठिकाणी क्रॅश झाले, त्या ठिकाणाला ‘तिरंगा’ या नावाने ओळखले जाणार असल्याची घोषणा यावेळी मोदींनी केली.
‘चांद्रयान-3’ मोहीम यशस्वीपणे पार पाडून भारताने जागतिक स्तरावर एक मोठा विक्रम केला आहे. 23 ऑगस्ट रोजी जेव्हा चांद्रयान-3 चंद्रावर लँड झाले, तेव्हा पंतप्रधान मोदी ब्रिक्स समिटसाठी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यानंतर ते ग्रीस दौऱ्यावर गेले. यानंतर भारतात आल्यावर त्यांनी थेट इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेत, चांद्रमोहिमेच्या यशासाठी त्यांचे अभिनंदन केले.