Sanjay Gaikwad : “एखाद्या बाईने म्हटले की मी बाप आहे, तर…”; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, फडणवीसांच्या विश्वासू महिला आमदाराविषयी वादग्रस्त वक्तव्य
Sanjay Gaikwad : या पार्श्वभूमीवर आता संजय गायकवाड यांनी श्वेता महाले यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Sanjay Gaikwad : बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजप आमदार श्वेता महाले यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप आमदार श्वेता महाले यांच्या पतीचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान ‘बाप तो बाप रहेगा’ हे लोकप्रिय गाणे वाजवण्यात आले होते. हे गाणे संजय गायकवाड यांना डिवचण्यासाठी लावण्यात आल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये श्वेता महाले धनुष्यबाण ओढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आता संजय गायकवाड यांनी श्वेता महाले यांना प्रत्युत्तर दिले आहे.
‘राजकारणातला खरा बाप कोण, हे योग्य वेळी दाखवू’
संजय गायकवाड म्हणाले, “बाप तो बाप रहेगा हे माणसाने बोलले तर शोभून दिसते. पण एखाद्या बाईने म्हटले की मी बाप आहे, तर बापासारखे शरीर कुठून आणणार? राजकारणातला खरा बाप कोण आहे, हे आम्ही योग्य वेळी दाखवून देऊ.” गायकवाड यांच्या या वक्तव्यावरून त्यांनी श्वेता महाले यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, गायकवाड यांनी विकासकामांच्या मुद्द्यावरूनही श्वेता महाले यांच्यावर निशाणा साधला. “माझ्यासोबत विकासकामांवरून स्पर्धा करा. मी शेतकऱ्यांना मदत करतो, तुम्हीही करा,” असे ते म्हणाले. तसेच वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करण्याऐवजी गरजूंना मदत करण्याचा सल्ला त्यांनी दिला. “वाढदिवसाच्या दिवशी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यापेक्षा गरजूंना मदत करायला हवी. वाढदिवस आम्हीही साजरे करतो; मात्र त्यात लोकांना मदत करतो, उधळपट्टी करत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
गायकवाडांच्या वक्तव्यामुळे भाजप-शिवसेना वाद पुन्हा पेटणार?
संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वक्तव्याची शिवसेनेचे वरिष्ठ नेते दखल घेणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संजय गायकवाड यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांच्या अनेक वक्तव्यांवरून वाद निर्माण झाले आहेत.
‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक आणि डाव्या संघटनेचे कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोपही गायकवाड यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप प्रकाशक प्रशांत आंबी यांनी केला आहे.






