ICDS Satara : घरी बसून मिळणार पोषण आहार! उन्हाळ्याच्या सुट्टीत अंगणवाडी सेविका करणार ‘हे’ मोठे काम
ICDS Satara : उन्हाची तीव्रता वाढल्याने बालकांना दिलासा; 'टेक होम रेशन' अंतर्गत पुढील १५ दिवसांचा कोरडा खाऊ थेट माता आणि बालकांच्या घरांपर्यंत पोहोचणार.

ICDS Satara – एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत (आयसीडीएस) सातारा जिल्ह्यात चार हजार 500 अंगणवाड्या सुरू आहेत. राज्यातील अंगणवाड्यांना महिनाभर सुट्टी देण्याची सूचना राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने केली आहे. मात्र, केंद्र शासनाच्या नियमानुसार बालकांना वर्षभरात किमान 300 दिवस पोषण आहार पुरवणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात प्रत्येक योजनेची अंमलबजावणी प्रभावीरित्या केली जात आहे.
या अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या शिक्षणावरच नव्हे, तर बालके, कुपोषित मुले आणि स्तनदा माता यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते. अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालके, कुपोषित मुले आणि स्तनदा मातांना पोषण आहार पुरवला जातो. सध्या उन्हाचा पारा चाळिशीच्या पार गेला असतानाही, जिल्ह्यात बालकांना आणि मातांना नियमितपणे पोषण आहार पोहोचवला जात आहे. केंद्र शासनाच्या 300 दिवसांच्या पोषण आहाराच्या नियमाची अंमलबजावणीही अचूक होत आहे.
सुट्टीचा पेचप्रसंग उद्भवला असला तरी जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराचा खंड पडू देण्यात आलेला नाही. या काळात लाभार्थ्यांना पुढील पंधरा दिवसांचा कोरडा खाऊ आणि पोषण आहार आधीच वितरीत करण्यात आला असल्याने बालहक्क आयोगाच्या सुट्टीच्या मार्गदर्शक सूचनेचे पालन होत आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून, बालकांना अंगणवाड्यांमध्ये जाणे त्रासदायक ठरू शकते.
यावर उपाय म्हणून ‘टेक होम रेशन’ अंतर्गत कोरडा पोषण आहार बालके आणि मातांच्या घरांपर्यंत पोहोचवला जात आहे. त्यामुळे बालकांचे पोषण सुरक्षित राहिले आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांमार्फत प्रत्येक लाभार्थ्याला मिळणार्या आहाराची अचूक नोंद ठेवली जाते. कुपोषित बालकांच्या वजनापासून मातांच्या पोषणापर्यंतचा सर्व डेटा केंद्र आणि राज्य शासनाला ऑनलाइन सादर केला जात आहे.




