HSC Exam: पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी दिलासा; 12वीचा परीक्षा अर्ज भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

12th exam application extended: मराठवाड्यासह राज्यातील जवळपास 20 जिल्ह्यांत पाऊस आणि महापुराने हाहाकार माजवला असून, शेती, पिके, घरेदारे आणि गुरेढोरे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या आपत्तीने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असताना, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे.
अनेक विद्यार्थ्यांची पुस्तके, वह्या आणि दफ्तरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर, पूरग्रस्त भागातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बारावीच्या परीक्षा अर्ज भरण्याची मुदत 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवार, 29 सप्टेंबर 2025 रोजी निश्चित केली होती. मात्र, पूरग्रस्त भागातील हजारो विद्यार्थ्यांना अर्ज भरणे शक्य झाले नव्हते. केवळ एक दिवस शिल्लक असताना सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे अशक्यप्राय असल्याने मुदतवाढीची मागणी जोर धरू लागली होती.
या मागणीला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारावीच्या अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची घोषणा केली. ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना यासंदर्भात सूचना देण्यात येतील, असे सांगितले.
शिंदे यांच्या सूचनेनुसार, शिक्षणमंत्री भुसे यांनी राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधून अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, शिक्षण विभागाने 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
याशिवाय, बाह्य पद्धतीने (प्रायव्हेट) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवली आहे. हा निर्णय पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरला आहे.





