“महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले? 13 लाख अतिरिक्त मते आली कुठून?”; आव्हाडांचा निवडणूक आयोगाला सवाल

Jitendra Awhad Questions ECI | विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर विरोधकांकडून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेसंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे. याच दरम्यान आता जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुकीमधील आकडेवारीबाबत एक पोस्ट शेअर करत निवडणूक आयोगाला काही सवाल केले आहेत.
जितेंद्र आव्हाड पोस्ट
“महाराष्ट्राच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना!” या मथळ्याखाली जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन शेअर केली आहे. यात आव्हाड यांनी म्हंटले की, “भारतीय निवडणूक आयोगानुसार, महाराष्ट्रातील एकूण मतदार 9,64,85,765 आहेत आणि यंदा मतदानाची टक्केवारी 65.02% होती. साधे गणित आहे 65.02% of 9,64,85,765 = 6,27,35,044.4… मात्र भारतीय निवडणूक आयोगाने 6,40,88,195 लोकांनी मतदान केल्याची नोंद केली आहे. यात अतिरिक्त 13,53,151 मते आहेत,” असा दावा केला आहे.
तसेचआव्हाड यांनी, “इतकेच नाही, तर 65.02% केल्यास त्यात 0.4 मतं असं गणित येतं. राज्यातच काय, संपूर्ण विश्वात अपूर्णांक मतं कशी असू शकतात? 13 लाख अतिरिक्त मते आली कुठून?” असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना !
ECI नुसार, महाराष्ट्रातील एकूण मतदार 9,64,85,765 आहेत आणि यंदा मतदानाची टक्केवारी 65.02% होती.
साधे गणित आहे – 65.02% of 9,64,85,765 = 6,27,35,044.4परंतु ECI ने 6,40,88,195 लोकांनी मतदान केल्याची नोंद केली आहे. यात अतिरिक्त…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 30, 2024
;
“आता मतदार नोंदणी पाहू. 2019 ते 2024 (5 वर्षे) महाराष्ट्रातील मतदारांची संख्या 50 लाखांनी वाढली, म्हणजे सरासरी प्रतिवर्षी 10 लाख. पण 2024 च्या सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अवघ्या 6 महिन्यांत मतदारांची संख्या 42 लाखांनी वाढली. 6 महिन्यांत 42 लाख वाढ म्हणजे 84 लाख/वर्षाचा वाढीचा दर, जो गेल्या 5 वर्षांतील सरासरी वार्षिक दराच्या 8.4 पट आहे! हा मतदार नोंदणीचा चमत्कार आहे की मतांमध्ये फेरफार आहे, हे तुम्हीच ठरवा,” असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
मतं वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड केली का?
“मतांमधील या विसंगती दोन गंभीर प्रश्न निर्माण करतात. पहिला मतं वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड केली का? आणि दुसरा भारतीय निवडणूक आयोग चुकीचा किंवा फेरफार केलेला डेटा प्रकाशित करत आहे का?” असे प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत. त्याचप्रमाणे, “या दोघांपैकी काही जरी झालं असेल, तरी हा प्रकार निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी करतोय. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले पाहिजे की 13 लाख अतिरिक्त मते का आहेत? महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले? ईव्हीएमचे स्वतंत्र ऑडिट केले जात आहे का?” अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.
मतमोजणीत पारदर्शकता आणावी
शेवटी आव्हाड यांनी, “लोकशाही ही लोकांच्या विश्वासावर अवलंबून असते. हे प्रश्न अनुत्तरीत राहिल्यास त्यावरून नक्कीच विश्वास उडेल. मतदार नोंदणी आणि मतमोजणीत पारदर्शकता आणावी अशी आमची मागणी आहे. लपवण्यासारखे काहीही नसेल, तर भारतीय निवडणूक आयोगाने या तपासणीचे स्वागत केले पाहिजे. आपल्या लोकशाहीच्या पायाचे रक्षण करण्याची प्रचंड गरज आज आहे,” असं म्हटलं आहे.
हेही वाचा:
पुणे जिल्हा : आर्यन, उदय, ऋतुजा महाराष्ट्र संघात





