Uttar Pradesh Holi : आधी होळी, नंतर नमाज, पोलीस सतर्क… ताडपत्रींनी झाकल्या मशिदी

Uttar Pradesh Holi : होळीचा सण शांततेत साजरा करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी राज्यभरात सुरक्षा उपाय वाढवले आहेत. या अंतर्गत, सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील भागांवर कडक नजर ठेवली जात आहे, गस्त वाढवण्यात आली आहे आणि टेहळणीसाठी ड्रोन देखील तैनात केले जात आहेत. राज्यातील सुमारे 12 जिल्ह्यांमध्ये होळीच्या शुक्रवारच्या नमाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. संभळसह अनेक ठिकाणी मशिदी ताडपत्रींनी झाकण्यात आल्या आहेत. आता राज्यात आधी होळी आणि नंतर नमाज होणार आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रमझान महिन्यातील होळी आणि शुक्रवारची नमाज एकाच दिवशी असल्याने पोलीस सतत सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे भडकाऊ मजकूर किंवा खोट्या बातम्यांवर नियंत्रण ठेवता येईल. गुरुवारी रात्री होलिका दहन आणि शुक्रवारी होळी साजरी होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी अधिकारी सर्वंकष सुरक्षा योजना राबवत आहेत.
#WATCH | Bareilly, Uttar Pradesh | Mosques being covered with Tarpaulin sheet ahead of Holi festival as per the decision of the local administration pic.twitter.com/991Ca0MEsg
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 13, 2025
पोलिस महासंचालक (डीजीपी) प्रशांत कुमार यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, जातीय सलोखा राखण्यासाठी संवेदनशील ठिकाणी पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. बाजारपेठ आणि सण समारंभांसह जास्त रहदारी असलेल्या भागात व्यापक गस्त घातली जात आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
संभाव्य धोके लवकर ओळखण्यासाठी ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेवली जात आहे. सार्वजनिक उपद्रव, गैरवर्तन रोखण्यासाठी पोलीस पथके सार्वजनिक ठिकाणी, दारूच्या दुकानांजवळ आणि वाहनांच्या आतील भागात दारू पिण्यास कडक बंदी घालत आहेत. आकस्मिक तपासणी केली जात असून उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येत आहे.
याशिवाय, स्थानिक पोलिस धार्मिक नेते, शांतता समित्या आणि समाजातील प्रभावशाली लोकांसोबत सणाच्या दरम्यान सलोख्याच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी सक्रियपणे गुंतलेले आहेत. चिंता दूर करण्यासाठी आणि शांततापूर्ण उत्सवाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध जिल्ह्यांतील प्रमुख लोकांसोबत बैठका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, चुकीची माहिती आणि प्रक्षोभक मजकुराचा प्रसार रोखण्यासाठी सोशल मीडियावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. यूपी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एक समर्पित पोलिस पथक डिजिटल प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवत आहे. बनावट बातम्या ओळखल्या जात आहेत आणि हिंसाचार किंवा दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.





