Ajit Pawar : राजीनामा द्यायचा की नाही, हे त्यांनीच ठरवावे; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांचं मोठं विधान

बीड : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी सांगितले आहे की, जी घटना बीडला घडली, ती अतिशय निंदनीय आहे. माणुसकीला काळं फासणारी घटना आहे
त्यामुळे त्यात जे कोणी दोषी असतील त्यांना शासन केले जाईल. कुणालाही सोडले जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्वरित एसआयटी, सीआयडी नेमली आहे. न्यायालयीन चौकशी देखील सुरू आहे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा नैतिक जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा दिला होता. आता या सगळ्या प्रकरणात राजीनामा द्यायचा की नाही, हे धनंजय मुंडे यांनीच ठरवावे, असं मोठं विधान अजित पवार यांनी केलं आहे. पुरावा नसेल म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नसेल पण मी आरोप झाल्यावर २०१०-११ वेळी राजीनामा दिला होता. माझ्या सद्वविवेक बुद्धीला आरोप झाले, ते पटले नव्हते. शेवटी ज्याचा त्याचा निर्णय ज्याने त्याने घ्यायचा असतो, असे विधान अजित पवार यांनी केले.
मी अनेक वर्षांपासून काम करतोय, मी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. मला अनेकदा बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. माझी प्रतिमा जनमानसांतील प्रतिमा खराब करण्याचाही प्रयत्न झाला. सिंचन घोटाळ्यावेळी आरोप झाल्यावर मी राजीनामा दिला हे खरंय पण त्यावेळी मला पटले नाही म्हणून मी राजीनामा दिला. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. आम्ही चौकशी करत आहोत, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.




