Weather update : अवकाळी पावसाचा कहर.! भिंत कोसळून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथे वीज कोसळून शेतकरी किरण कराळे यांचा एक बैल आणि एक गाय दगावली. शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली जनावरे गमावल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

Weather update : राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. परभणी जिल्ह्यात या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
परभणी तालुक्यातील इंदेवाडी येथे वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेल्यानंतर विटांची भिंत कोसळली. या दुर्घटनेत ११ वर्षीय दिपाली विजय नंदगे हिच्या डोक्यावर भिंत कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
दुसरीकडे, गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथे वीज कोसळून शेतकरी किरण कराळे यांचा एक बैल आणि एक गाय दगावली. शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली जनावरे गमावल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. (Weather update)
तसेच पोखरणी रेल्वे स्थानकावर वादळी वाऱ्यामुळे पत्र्याचे शेड उडून थेट ओव्हरहेड वायरवर पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम टळला.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथे अनधिकृत लोखंडी होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वादळी वाऱ्यादरम्यान घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी : (Weather update)
भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 24 तास नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन :
हवामान विभागाने नागरिकांना वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांनी पिके, जनावरे आणि शेती साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे, तर नागरिकांनी खराब हवामानाच्या काळात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हे देखील वाचा :
Weather update : राज्यावर अवकाळी संकट ! पुढील 24 तास महत्त्वाचे, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा






