Nashik Rain: नाशिककरांचे संकट टळलं? भोवरा दुसऱ्या दिशेने सरकल्याने आता ‘या’ जिल्ह्याला ढगफुटीचं संकट
Nashik Rain: धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

Nashik Rain: नाशिकमध्ये ढगफुटीसदृश पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. काल हवामान खात्याने पालघरमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाला कारणीभूत असणारा भोवरा मंगळवारी नाशिक परिसरात सरकेल, असे भाकीत केले होते.
हवामान खात्याने नाशिकला रेड अलर्ट दिल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण होते, मात्र आता नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याच्या प्रवाहामुळे सोमवारी पालघरमध्ये तब्बल ४५० मिलिमीटर इतका धुवाधार पाऊस पडला होता. हाच वाऱ्याचा प्रवाह पुढे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या पट्ट्यात सरकण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.
मात्र, वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे हे धोकादायक ढग आता नाशिक सोडून अहिल्यानगर आणि गुजरातच्या सुरत शहराच्या दिशेने पुढे सरकले आहेत. त्यामुळे नाशिकवरील थेट ढगफुटीचा धोका आता टळला आहे. परंतु नाशिक, इगतपुरी, त्रंबकेश्वर भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी कायम राहणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन (Nashik Rain)
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हवामानातील बदल पाहता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. संकट टळल्याने नाशिककरांनी सुटकेचा श्वास सोडला असला, तरी पुढील काही तास खबरदारी बाळगणे आवश्यक आहे, अशा सूचना नागरिकांना केल्या आहेत.
Nashik Rain: नाशिककरांचे संकट टळलं? भोवरा दुसऱ्या दिशेने सरकल्याने आता ‘या’ जिल्ह्याला ढगफुटीचं संकट
दरम्यान, काल रात्रीपासून धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 37% भरले आहे. तर सततच्या पावसामुळे धरण क्षेत्रातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष दिले जात आहे.
हेही वाचा:





