Haribhau Bagade : उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नाही; हरिभाऊ बागडे यांनी दिले निर्देश

जयपूर : राजस्थानमध्ये उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. शैक्षणिक दर्जा खराब असलेल्या महाविद्यालये व संस्थांनी तात्काळ सुधारणा कराव्यात, अन्यथा त्यांना बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट निर्देश राज्यपाल व कुलपती हरिभाऊ बागडे यांनी दिले. राज्यात ‘सुधारा किंवा बंद करा’ हे धोरण काटेकोरपणे राबवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकभवन येथे झालेल्या कुलगुरू समन्वय समितीच्या बैठकीत बोलताना त्यांनी परवानगीशिवाय विद्यापीठस्तरीय मान्यता देणाऱ्या संस्थांविरोधात कठोर कारवाईचा इशाराही दिला. शिक्षणाच्या गुणवत्तेशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. राज्यपालांनी सर्व विद्यापीठांना नॅकच्या रँकिंग सुधारण्यासाठी वेळेत व प्रभावी पावले उचलण्याचे निर्देश दिले. रँकिंगमध्ये येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडवण्याचे आवाहन करताना, भरती व आर्थिक मंजुरीसंबंधी प्रश्न लवकर निकाली काढले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. भारतीय इतिहास, संस्कृती व मूल्यांशी संबंधित अभ्यास मजबूत करण्याचे निर्देश देत, शिक्षक-विद्यार्थी संवाद वाढवण्यावर त्यांनी भर दिला. तसेच, सर्व विद्यापीठांनी दरवर्षी कमी खर्चात दीक्षांत समारंभ आयोजित करावेत, नियमित ऑडिट करावे आणि गावे दत्तक घेऊन शिक्षण, कौशल्य विकास व ग्रामीण विकासासाठी कार्य करावे, असे निर्देशही राज्यपालांनी दिले.





