ऐसा जो कामक्रोधलोभा । झाडी करुनि ठाके उभा । तोचि येवढिया लाभा । गोसावी होय ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा, ओवी 444 संत ज्ञानेश्वर महाराज यांनी श्री ज्ञानेश्वरीच्या रूपाने अनमोल ज्ञानाचे भांडार जगासमोर ठेवले आहे.
सोळाव्या अध्यायातील या ओवीत माऊलींनी, झालेले ज्ञान स्थिर होण्याकरिता साधकाच्या मनाची अवस्था कशी असावी, याचे वर्णन केले आहे. ते म्हणतात की, जेव्हा आपल्या आयुष्यातून काम, क्रोध आणि लोभ संपूर्णपणे निघून जातील तेव्हाच आपण झालेले पारमार्थिक ज्ञान मनात स्थिर होऊन त्या ज्ञानाचा स्वामी होण्याची अपेक्षा करू शकतो.
ज्याप्रमाणे एखादे उत्तम बी हातात आले तरी त्याची पेरणी चांगली मशागत केलेल्या शेतात केली तरच चांगले पीक हातात येते, त्याचप्रमाणे अध्यात्मिक ज्ञान कर्मधर्मसंयोगाने आपल्या हातात पडले तरी जीवनात ते नीट रुजायला, त्याची पूर्ण जोपासना होऊन फळ हातात यायला मनातील कामक्रोधलोभरूपी तण नसणे आवश्यक आहे.