नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या ‘इंडिगो‘च्या विस्कळीत सेवेचा फटका हजारो प्रवाशांना बसत असतानाच, केंद्र सरकारने शनिवारी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. इंडिगोच्या रद्य झालेल्या उड्डाणांमुळे अनेक मार्गांवर गगनाला भिडलेल्या विमान भाड्यावर (Airfare) सरकारने आता कमाल मर्यादा (Upper Limit) निश्चित केली आहे. इतकेच नव्हे, तर रद्द झालेल्या विमानांच्या प्रवाशांचे पैसे (Refund) रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत परत करण्याचे कडक निर्देश नागरी उड्डाण मंत्रालयाने इंडिगोला दिले आहेत. सलग पाचव्या दिवशी गोंधळ – इंडिगो एअरलाईन्सची सेवा सलग पाचव्या दिवशी कोलमडलेली पाहायला मिळाली. क्रू मेंबर्सच्या (चालक दल) कमतरतेमुळे कंपनीला शेकडो उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. अचानक उड्डाणे रद्द झाल्याने आणि विमानांची संख्या कमी झाल्याने अनेक मार्गांवर तिकिटांचे दर प्रचंड वाढले होते. या अवाजवी भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते. मंत्रालयाचा हस्तक्षेप – परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरी उड्डाण मंत्रालयाने आपल्या नियामकीय अधिकारांचा वापर करत हस्तक्षेप केला आहे. सर्व बाधित मार्गांवर प्रवाशांकडून ‘योग्य आणि वाजवी’ भाडे आकारले जावे, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, जोपर्यंत विमान सेवा आणि परिस्थिती पूर्ववत होत नाही, तोपर्यंत ही भाडे मर्यादा लागू राहील. कंपन्यांना कडक सूचना – मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सर्व विमान कंपन्यांना अधिकृत निर्देश देण्यात आले असून, ठरवून दिलेल्या भाडे मर्यादेचे आता काटेकोरपणे पालन करावे लागेल.” दरम्यान, ही कमाल भाडे मर्यादा नेमकी किती असेल, याबाबतची तांत्रिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.