मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे तीव्र उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला आता नवे वळण मिळाले असून, राज्य सरकारने जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाठवले आहे. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे. जरांगे यांनी मांडलेल्या मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी हे शिष्टमंडळ कसोशीने प्रयत्न करणार आहे. आझाद मैदानावर जरांगे यांच्या उपोषणाला तीव्र स्वरूप प्राप्त झाले असून, मराठा समाजाचा पाठिंबा त्यांना मोठ्या प्रमाणात मिळत आहे. यामुळे सरकारवर दबाव वाढला आहे. शिष्टमंडळाच्या या भेटीमुळे सरकार आणि आंदोलकांमधील तणाव निवळून आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरच मार्ग निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. जरांगे यांच्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते आणि ही चर्चा कशा पद्धतीने पुढे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाच्या या लढ्याचा पुढील टप्पा काय असेल, हे लवकरच स्पष्ट होईल. आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही एक इंचही हटणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही एक इंच देखील इथून हटणार नाही. जोपर्यंत आमचे मनोज दादा इथे बसलेले आहे. तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. तीन वाजो, पाच वाजो, कितीही दिवस लागो, जोपर्यंत आमचे दादा इथे आहे तोपर्यंत मराठा बांधव मुंबईतून हटणार नाही. आम्हाला गोळ्या घातल्या तरीही आम्ही हटणार नाही. आम्हाला आरक्षण द्या, आम्ही आमच्या गावी जातो, असं मराठा आंदोलकांनी म्हटले आहे.