देवाभाऊ अभिनंदन ! फडणवीसांना हिणवणारे तेच विरोधक आज पडले प्रेमात; बदलतं राजकारण महाराष्ट्राला कोणत्या दिशेला नेणार?

Devendra Fadnavis : गेल्या पाच वर्षात बदलेली राजकीय समीकरणं पाहता महाराष्ट्रात कधीही काहीही घडू शकतं. त्यामुळेच आता ठाकरे गट आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याची चर्चा रंगू लागलीय. त्याला कारणही तसंच आहे. नुकतंच हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना फुलगुच्छ देऊन अभिनंदन केलं. त्यानंतर बंद दाराआड दोघांमध्ये ८ मिनिटं चर्चा झाली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
दरम्यान, आता पुन्हा एकदा असंच काहीस घडलं आहे. कट्टर राजकीय शत्रू असलेल्या देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे गट गोडवे गात आहे. आज (दि. ३) शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या आणि दैनिक ‘सामना’तील अग्रलेखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चक्क कौतुक करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
‘सामना’च्या अग्रलेखात नेमकं काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षात कामाला सुरुवात केली व त्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची निवड केली. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री मलईदार खाती आणि विशिष्ट जिल्ह्याचेच पालकमंत्रीपद मिळावे यासाठी अडून बसले असतानाच मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीत पोहोचले व त्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्या वर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीमध्ये घालवला. नुसताच घालवला नाही, तर अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन केले. काही प्रकल्पांचे लोकार्पण केले. त्या वेळी बोलताना त्यांनी गडचिरोलीच्या विकासाच्या नव्या पर्वाचा हवाला दिला. मुख्यमंत्री म्हणाले तसे खरेच होणार असेल तर ते फक्त गडचिरोलीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच सकारात्मक म्हणावे लागेल, असे सामना अग्रलेखात म्हंटले आहे.
गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा, यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत. ते चुकीचे नाही. फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा ‘विडा’ आपण तेथील सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठीच उचलला आहे, कोणा खाणसम्राटांसाठी नाही, हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागेल.
तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, हा त्यांचा वादा खरा होईल. बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
फडणवीसांबरोबर जुळवून घेण्याची रणनीती…
एकेकाळी याच विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड उठवली होती. जे टीका करत होते तेच आता फडणवीसांचे गोडवे गात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता विरोधकांनी फडणवीसांबरोबर जुळवून घेण्याची रणनिती आखली तर नाही ना? असं ही बोललं जात आहे.
जर असं असेल तर हे बदलतं राजकारण महाराष्ट्राला कोणत्या दिशेने नेणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. भाजप आणि शिंदे गटात खाते वाटपावरून टोकाचे संबंध ताणले गेले असून सारंकाही आलबेल नसल्याचं देखील काहीदिवसापुर्वी बोललं जात होत. त्यामुळे आगामी काळात राज्यात कोणती मोठी घडामोड घडते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
सुप्रिया सुळेंनी केलं फडणवीसांचं कौतूक !
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘असं दिसतंय की एकच व्यक्ती मोठ्या ताकदीने काम करत आहे, त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. इतर कोणी कुठेही दिसत नाही. या सरकारमध्ये मिशन मोडमध्ये केवळ देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. टीव्ही पाहा किंवा इतर कुठेही पाहा, केवळ फडणवीसच दिसत आहेत. चांगली बाब म्हणजे त्यांनी जबाबदारी घेतली आणि आणि त्यांना आमच्याकडून शुभेच्छा’, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
तसंच गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी गडचिरोली दौरा केला. नक्षलग्रस्त भागातील फडणवीसांच्या दौऱ्यावरुनही सुप्रिया सुळेंनी फडणवीसांचं कौतुक करत ते चांगलं काम करत असल्याचं सांगितलं. की ‘देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. आरआर पाटील देखील असंच काम करत होते. आबा पाटील गृहमंत्री बनले होते, त्यावेळी ते गडचिरोलीत अनेकदा जात होते. त्यांचं चांगलं काम आज देवेंद्र फडणवीस पुढे घेऊन जात आहेत.’ असं देखील यावेळी ते म्हणाले.





