Girl Safety: विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! भुईंज, पाचवड येथे रोडरोमिओंच्या त्रासामुळे पालक चिंताग्रस्त
Girl Safety: देगाव, किकली, चिंधवलीसह परिसरातील शेकडो विद्यार्थिनी मानसिक तणावात; शैक्षणिक परिसरात विशेष पोलीस बंदोबस्ताची गरज.

Girl Safety – भुईंज व पाचवड हे पंचक्रोशीतील गावांसाठी शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. याठिकाणी देगाव, किकली, चिंधवली, आसले, बेलमाची, लगडवाडी, खोलवडी, काळंगवाडी, जांब, भुईंज येथील वाड्यावस्त्यांसह परिसरातील गावांमधून शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी दररोज येथे शिक्षणासाठी येतात मात्र, शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासेस भरताना तसेच सुटण्याच्या वेळेत काही टवाळखोर तरुणांकडून होणार्या गैर वर्तनामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या प्रकारांमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनीही तीव्र चिंता व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही तरुण शाळा, महाविद्यालये, क्लासेस, बसस्थानक, परिसरात तसेच प्रमुख रस्त्यांवर विनाकारण थांबून विद्यार्थिनींची छेड काढणे, पाठलाग करणे, अवाजवी टिप्पणी करणे, दुचाकींवरून वेगाने फेर्या मारणे अशा प्रकारांना प्रोत्साहन देत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर येत आहेत.
त्यामुळे अनेक विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली शिक्षण घेत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. विशेषतः सकाळी शाळा-कॉलेज सुरू होण्याच्या वेळेत आणि दुपारी तसेच सायंकाळी सुटण्याच्या वेळी शैक्षणिक परिसरात आणि मुख्य चौकांमध्ये पोलिसांची नियमित गस्त नसल्याची खंतही नागरिकांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थिनी सुरक्षित वातावरणात शिक्षण घेऊ शकतील, यासाठी या वेळेत पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी जोर धरत आहे.
पालकांनी प्रशासनाकडे केलेल्या मागण्यांमध्ये शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात नियमित पोलीस गस्त, संवेदनशील ठिकाणी पोलिसांची कायमस्वरूपी उपस्थिती, संशयास्पद हालचाली करणार्या टवाळखोरांवर तातडीने कारवाई तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विशेष पथकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
यासंदर्भात भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले. शाळा, महाविद्यालये आणि क्लासेस भरताना व सुटण्याच्या वेळेत आवश्यकतेनुसार पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात येईल. तसेच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणार्या व महिलांची छेड काढणार्या टवाळखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
स्थानिक नागरिक, पालक, शिक्षक आणि सामाजिक संघटनांनीही विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन, शैक्षणिक संस्था आणि पालक यांनी संयुक्तपणे पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली आहे. सुरक्षित आणि निर्भय वातावरणात शिक्षण घेणे हा प्रत्येक विद्यार्थिनीचा मूलभूत अधिकार असून या दृष्टीने प्रभावी उपाययोजना तातडीने राबविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.





