गिरीश महाजन यांचा दिवाकर रावतेंना टोला
मुंबई : विधानसभा निवडणुकीत युतीच्या जागावाटपाबदद्ल अनेक समीकरणे समोर येत असताना शिवसेना आणि भाजप युती शंभर टक्के होईल, असा दावा भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. तसेच ज्यांना अधिकार नाही त्यांनी युतीबद्दल बोलू नये, असा अप्रत्यक्ष टोला महाजन यांनी नाव न घेता शिवसेना नेते दिवाकर रावते यांना लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीत जागावाटपात शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वक्तव्य दिवाकर रावते यांनी काल केले होते. याला प्रत्युत्तर देताना महाजन यांनी युतीबाबत बोलण्याचा अधिकार फक्त तीन वरिष्ठ नेत्यांना असून, बाकीच्यांनी मध्ये-मध्ये बोलू नये, असा सल्ला दिला. तसेच महाजनादेश यात्रेच्या समारोपानंतर युतीच्या चर्चेला पुन्हा सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
येत्या चार ते पाच दिवसात युतीचा तिढा सुटणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच दोन-तीन दिवसांत आचारसंहिता लागेल, तोपर्यंत युतीचा अंतिम निर्णय होईल, असही ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटणार या रावते यांच्या विधानचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. अमित शहा आणि मुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत याआधीच जर 50-50चा फॉर्मुला ठरला आहे, तर रावतेंनी केलेले विधान मला काहीही चुकीचे वाटत नाही, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.