Gas Shortage – आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती आणि इंधन पुरवठ्यातील तांत्रिक अडचणींमुळे पुणे-सातारा महामार्गावरील हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने अनेक हॉटेल चालकांनी व्यवसाय बंद ठेवला आहे, तर काहींनी चक्क ‘चुली’चा आधार घेत ग्राहकांची भूक शमवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. इस्रायल-इराण संघर्षाचे पडसाद जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटत असून भविष्यातील गॅस टंचाईची भीती नागरिकांमध्ये आहे. विशेषतः शहरांमधील फ्लॅट संस्कृतीत चूल पेटवणे अशक्य असल्याने, गॅस टंचाई भासल्यास नागरिक पुन्हा गावांकडे वळण्याची चिन्हे आहेत. भोर तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिक कामानिमित्त पुणे-मुंबईत स्थलांतरित झाले आहेत, मात्र सध्याची स्थिती पाहता हे नागरिक उन्हाळी सुट्टीत लवकरच गावी परतण्याची शक्यता आहे. पुणे-सातारा महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठी असते. मात्र, इंधन टंचाईमुळे अनेक हॉटेल चालक रात्रीच्या वेळी लवकरच हॉटेल्स बंद करत आहेत. परिणामी, रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अन्नासाठी भटकंती करावी लागत असून त्यांची मोठी गैरसोय होत आहे. “कमर्शियल गॅस मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे यासाठी आम्ही चुलीचा अवलंब केला आहे. हॉटेलमध्ये ग्राहक आल्यानंतर त्यांच्या ऑर्डरचे जलद गतीने होणारे पदार्थ गॅसवर करीत आहे तर मांसाहारी व शाकाहारी भाजी चुलीवर बनवत आहे. ग्राहकांची ऑर्डर घेतल्यानंतर त्यांना सेवा पुरवण्यास चुलीमुळे उशीर होत आहे परंतु उशीर जरी झाला तरी ग्राहकांना चवदार अन्न मिळत आहे.” – भरत सोनवणे, प्रोप्रायटर, हॉटेल जय मल्हार गॅस बुकिंगमधील तांत्रिक अडचणी सध्या ग्रामीण भागात गॅस बुकिंगसाठी ४५ दिवसांचे, तर शहरात २५ दिवसांचे अंतर अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, बुकिंग करताना मोबाईलवर ‘ओटीपी‘ (OTP) न येण्यासारख्या तांत्रिक अडचणी येत आहेत. ओटीपीशिवाय वितरक गॅस टाकी देत नसल्याने ग्राहक आणि व्यावसायिक दोघेही कात्रीत सापडले आहेत.