Shahaji Bapu Patil : “गणेश नाईक यांनी शरद पवार यांना संपर्क साधून…”; शहाजी बापू पाटलांचा खळबळजनक आरोप
Shahaji Bapu Patil : अशातच आता शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी या मुद्यावर भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका करत खळबळजनक आरोप केला आहे.

Shahaji Bapu Patil : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवीन आरोग्य सेवा सुरू करण्यात आली असून, यासाठी 15 जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या कार्यक्रमपत्रिकेत उपमुख्यमंत्री, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मुद्यावर राजकारण तापले असून शिंदेंच्या शिवसेनेकडून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आता शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी या मुद्यावर भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका करत खळबळजनक आरोप केला आहे.
नेमकं काय म्हणाले शहाजी बापू पाटील?
गणेश नाईक हा कद्रू मनाचा आणि अल्पसंतुष्ट माणूस आहे. राज्यात महायुतीच्या प्रत्येक नेत्याने साधन सुचिता ही पाळलीच पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यक्रमात पालकमंत्र्याचे नाव असणे हे पालकमंत्री पद निर्माण झाल्यापासून पाळले जात असते. गणेश नाईक हे भाजपचे निष्ठावंत वगैरे अजिबात नाही, अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली आहे. 1997 मध्ये महायुतीचे सरकार असताना या गणेश नाईक यांनी शरद पवार यांना संपर्क साधून मनोहर जोशी यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा डाव अपयशी ठरल्याचा खळबळजनक आरोपही शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.
शहाजी बापू पाटलांचं मोठं विधान
“मी आणि माझी नवी मुंबई, मीच इथला राजा” अशी भावना गणेश नाईक यांच्या मनात असल्याची टीका करत लोकशाहीत अशी मानसिकता चालत नसल्याचे पाटील म्हणाले. भविष्यात नवी मुंबईच्या राजकारणातून गणेश नाईक यांचे अस्तित्व संपलेले दिसेल, असे मोठं विधानही शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या आरोप आणि दाव्यांमुळे या मुद्यावरुन राजकारण आणखी तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा : Employee Transfer: तपासणीपूर्वीच कर्मचाऱ्यांचे आजारपण गायब! वैद्यकीय समिती नेमल्याचा धसका
नेमकं प्रकरण काय?
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमाच्या पत्रिकेत उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. भाजपकडून वारंवार एकनाथ शिंदे यांचे नाव डावलले जात असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी 15 जूनला तीव्र आंदोलन छेडले. वाशी येथील रुग्णालयातील कार्यक्रमासाठी मंत्री गणेश नाईक दाखल होताच शिवसैनिकांनी त्यांच्या वाहनाला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी आपला निषेध नोंदवला.
गणेश नाईक काय म्हणाले?
या प्रकरणाबाबत माध्यमांनी गणेश नाईक यांना प्रश्न विचारला असता, “यासंदर्भात महापौरांनाच विचारा,” असे उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, या नव्या वादामुळे नवी मुंबईतील महायुतीमधील अंतर्गत मतभेद अद्याप कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा राजकीय संघर्ष पुढे कोणते नवे वळण घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा : Khalapur News: नवे दप्तर, नवी उमेद! खालापुरात शाळांचा पहिला दिवस ठरला ‘सुपरहिट’; पाहा कसं झालं स्वागत






