Assam: आसामच्या कछार जिल्ह्यातील पैलापूल येथे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा १० फुटांचा पुतळा अज्ञात व्यक्तींनी उद्ध्वस्त केला. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसने तीव्र निषेध नोंदवत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेस नेते प्रदीप कुमार डे यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी फिरायला निघालेल्या स्थानिकांनी ही तोडफोड प्रथम निदर्शनास आणली. “आम्ही तातडीने पोलिसांना कळविले. सुरुवातीला अधिकाऱ्यांनी पुतळा आपोआप कोसळला असल्याचा दावा केला; मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक गट खोदकाम यंत्राच्या साहाय्याने पुतळा पाडताना दिसला,” असे त्यांनी बुधवारी स्पष्ट केले. हा पुतळा सन २००० मध्ये नेहरू महाविद्यालयासमोर उभारण्यात आला होता; हे महाविद्यालय १९६५ साली स्थापन झाले होते. पोलीस तपास सुरू – स्थानिक पोलीस अधिकारी शंकर दयाल यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून तोडफोडीसाठी वापरलेले खोदकाम यंत्र जप्त करण्यात आले आहे. “आमच्याकडे डिजिटल पुरावे उपलब्ध आहेत. संशयितांची ओळख पटताच अटक केली जाईल,” असे त्यांनी सांगितले. काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल – काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अभिजीत पॉल यांनी या घटनेची तुलना बांगलादेशात शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्यांच्या विटंबनेशी केली. “नेहरू स्वातंत्र्यसेनानी होते, त्यांनी भारताचे भवितव्य घडविले. त्यांचा पुतळा उद्ध्वस्त करणे लाजिरवाणे आहे,” असे ते म्हणाले. ही घटना भाजप आमदार कौशिक राय यांच्या मतदारसंघात घडली असतानाही राय यांनी एकही शब्द उच्चारला नसल्याबद्दल पॉल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इतर भाजप नेत्यांनीही या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिल्याचे समजते. काँग्रेसने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.