Farokh Engineer PadmaShri : माजी भारतीय क्रिकेटपटूची धक्कादायक व्यथा! पद्मश्री पुरस्कार जाहीर होऊन ५३ वर्षे लोटली, पण अजून मिळाला नाही
Farokh Engineer PadmaShri : माजी यष्टीरक्षक-फलंदाज फारुख इंजिनियर यांना पद्मश्री जाहीर होऊन तब्बल ५३ वर्षे उलटली तरी प्रत्यक्षात हा पुरस्कार मिळालेला नाही

Former Cricketer Farokh Engineer Awaits Padma Shri Award Since 1973 : भारत सरकारकडून क्रीडा, कला आणि सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी मानाच्या पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. मात्र, भारतीय क्रिकेटच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार आणि अनेक ऐतिहासिक विजयांचे शिल्पकार असलेले माजी यष्टीरक्षक-फलंदाज फारुख इंजिनियर (Farokh Engineer) यांना पद्मश्री जाहीर होऊन तब्बल ५३ वर्षे उलटली तरी प्रत्यक्षात हा पुरस्कार मिळालेला नाही, अशी अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारी बाब समोर आली आहे. खुद्द फारुख इंजिनियर यांनीच याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
१९७३ मध्ये घोषणा, पण हातात कधीच पडला नाही पुरस्कार –
मूळचे मुंबईचे असलेले आणि सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेले ८८ वर्षीय फारुख इंजिनियर यांनी त्या वेळची आठवण सांगताना म्हटले, “मला तो क्षण आजही स्पष्ट आठवतो. १९७३ मध्ये मी लँकेशायरकडून इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत असताना आमचे संघ व्यवस्थापक हेमू अधिकारी यांनी मला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी दिली. सर्व वर्तमानपत्रांत बातम्या झळकल्या, सर्वांनी अभिनंदनही केले. मात्र, त्यानंतर सरकारच्या वतीने मला कधीही अधिकृत पत्र किंवा पुरस्कार प्रदान करण्यासाठी निमंत्रण आलेच नाही.”
अधिकृत वेबसाईटवर नाव, पण पत्र कधी आलेच नाही –
विशेष म्हणजे भारत सरकारच्या पद्म पुरस्कारांच्या अधिकृत संकेतस्थळावर (Official Portal) १९७३ च्या पद्मश्री विजेत्यांच्या यादीत आजही फारुख इंजिनियर यांचे नाव अभिमानाने नोंदवलेले आहे. “त्या काळात माहिती मिळवण्यासाठी वर्तमानपत्रे हेच एकमेव साधन होते. मला सरकारकडून कोणतेही पत्र न आल्याचे मी व्यवस्थापक हेमू अधिकारी यांना सांगितले, तेव्हा सरकार थेट पत्र पाठवेल असे ते म्हणाले होते. मात्र, त्या दिवसापासून आजतागायत ५ दशके उलटून गेली तरी मला काहीही माहिती मिळालेली नाही,” अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.
फारुख इंजिनियर यांची अविस्मरणीय क्रिकेट कारकीर्द –
फारुख इंजिनियर यांनी १९६१ ते १९७५ या कालावधीत भारतासाठी ४६ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी २ शतके आणि १६ अर्धशतकांच्या मदतीने २,६११ धावा केल्या आहेत. यष्टीरक्षक म्हणून त्यांनी कसोटीत ६६ झेल आणि १६ यष्टीचीत (Stumping) केले. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११४ धावांसह यष्टीमागे ४ झेल टिपले. भारताच्या दिग्गज फिरकी चौकडीसमोर निडरपणे यष्टीरक्षण करणाऱ्या या महान खेळाडूबाबत व्यवस्थेने दाखवलेला हा निष्काळजीपणा क्रीडाप्रेमींमध्ये संताप व्यक्त करणारा ठरत आहे.





