Food Safety Maval: साहेब, आम्ही माणसं नाहीत का..? राज्यभर एफडीएच्या कारवाया; मावळ तपासणीपासून दूर का?
Food Safety Maval: लाखोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; हॉटेल्स, ढाबे आणि मेडिकल्सवर सरप्राईज तपासणीची मागणी.

– निलेश ठाकर
Food Safety Maval – राज्यभर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री, अस्वच्छ हॉटेल्स, नियमांचे उल्लंघन करणारी रेस्टॉरंट्स, बनावट औषधे, परवान्यांशिवाय सुरू असलेली मेडिकल्स तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांवर धडक कारवाया करत आहे. मात्र राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन केंद्रांपैकी एक असलेल्या मावळ तालुक्यात अशा प्रकारची व्यापक तपासणी अद्याप दिसून येत नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मावळ तालुका हा पर्यटन, धार्मिक स्थळे आणि निसर्गरम्य परिसरासाठी देशभर प्रसिद्ध आहे. लोणावळा, खंडाळा, पवना धरण, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड, विसापूर, तिकोणा, तुंग, भुशी धरण, पवना बॅकवॉटर आदी ठिकाणी दररोज हजारो पर्यटक भेट देतात. शनिवार-रविवार, सार्वजनिक सुट्ट्या आणि पावसाळ्यात ही संख्या अनेक पटींनी वाढते.
पर्यटकांच्या गर्दीमुळे या भागात शेकडो हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, फास्ट फूड सेंटर, ज्यूस सेंटर, चहा स्टॉल, पानटपऱ्या आणि खाद्यपदार्थ विक्रीची असंख्य आस्थापने कार्यरत आहेत. पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढत असताना अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन कितपत केले जाते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ खुले ठेवले जातात, पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जाते,
स्वच्छतेचे नियम पाळले जात नाहीत, तसेच कालबाह्य किंवा निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांच्या वापराबाबतही नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारी केल्या जातात. तरीदेखील या परिसरात अन्न व औषध प्रशासनाची व्यापक तपासणी झाल्याचे चित्र दिसत नसल्याची चर्चा आहे. विशेषतः पावसाळ्यात लोणावळा आणि पवना परिसरात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते.
रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. गरम भजी, वडापाव, चायनीज पदार्थ, मका, चहा, कॉफी, सरबत, आईस्क्रीम, शीतपेये अशा विविध खाद्यपदार्थांची विक्री दिवसभर सुरू असते. या ठिकाणी वापरले जाणारे पाणी, तेल, कच्चा माल आणि स्वच्छतेची परिस्थिती याबाबत वेळोवेळी तपासणी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
नियमित तपासणी करण्याची मागणी
नागरिकांचे म्हणणे आहे की, अन्न व औषध प्रशासनाच्या नियमित तपासण्यांमुळे व्यावसायिकांमध्ये नियमांचे पालन करण्याबाबत शिस्त निर्माण होते. स्वच्छता राखली जाते, निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री रोखली जाते आणि ग्राहकांचाही विश्वास वाढतो. त्यामुळे केवळ तक्रार आल्यानंतरच नव्हे, तर नियमित आणि अचानक तपासण्या होणे आवश्यक आहे. अन्न सुरक्षा हा केवळ पर्यटकांचा नव्हे तर स्थानिक नागरिकांचाही प्रश्न आहे.
औषध विक्री केंद्रांचीही तपासणी आवश्यक
याशिवाय मेडिकल्समध्ये औषधांची साठवणूक, कालबाह्य औषधांची विक्री, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांचे वितरण तसेच परवान्यांच्या अटींचे पालन याचीही तपासणी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राज्यभर ज्या पद्धतीने मेडिकल्सवर कारवाई होत आहे, त्याच धर्तीवर मावळातील औषध विक्री केंद्रांचीही तपासणी व्हावी, अशी मागणी होत आहे.






