सह्याद्री कारखान्यासमोरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; आ. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडले लोकार्पण

यशवंतनगर : यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासमोरील उड्डाणपुलाचे लोकार्पण माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांची व वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी हा पूल आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी सह्याद्री कारखान्याचे संचालक जशराज पाटील, राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, मानसिंगराव जगदाळे, लक्ष्मीताई गायकवाड, शारदा पाटील, माणिकराव पाटील, अविनाश माने, लालासाहेब पाटील, डी. बी. जाधव, रामचंद्र पाटील, सर्जेराव खंडाईत, लहुराज जाधव, माजी सरपंच गोविंदराव थोरात, संजय कुंभार, जयवंत थोरात, रामदास पवार, बजरंग पवार, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, अभियंता प्रताप चव्हाण, सिध्दार्थ चव्हाण, दत्तात्रय शेलार, गणेश नलवडे, शुभम चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागचे उप अभियंता गिरीश सावंत, शाखा अभियंता आर. एस. टोपे, महेंद्र पांचारीया व कारखान्याचे सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पुल वाहतूकीसाठी खुला करण्यात आल्यामुळे वाहनचालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या उड्डाणपुलामुळे व सेवा रस्त्यांमुळे कारखान्याची वाहतूक स्वतंत्र होणार आहे, त्यामुळे राज्य मार्गावरील अतिरिक्त वाहतुकीचा ताण कमी होईल. तसेच मसूरहून कराडकडे येणाऱ्या व कराडहून मसूरकडे जाणाऱ्या वाहनांचे दळणवळण सुलभ होणार आहे. कारखान्याची वाहने व राज्य मार्गावरील वाहतूक करणारी वाहने यामध्ये कोणतीही तक्रार राहणार नाही. या उड्डाणपुलासह सेवा रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण होऊन दळणवळणात सुलभता येण्यास मदत होणार आहे.
वाहनधारकांची गैरसोय होत असल्यामुळे पुल सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार आज पुलाचे छोटेखानी उदघाटन करुन पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली. आता सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल. पुलामुळे परिसरातील लोकांना रहदारीसाठी चांगली मदत होईल. सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
– आमदार बाळासाहेब पाटील.





