फिट्चने भारताचे पतमानांकन बीबीबी- वर कायम ठेवले; अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे चालू खात्यावरील तूट वाढण्याची शक्यता

न्यूयॉर्क – इतर देशांपेक्षा भारताचा विकास दर जास्त आहे. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूक वाढत आहे. या कारणामुळे फिट्च या पतमानांकन संस्थेने भारताचे पतमानांकन कमी न करता बीबीबी- उणे या पातळीवर कायम ठेवले आहे. मात्र भारतावर कर्ज जास्त आहे. त्याचबरोबर भारताची वित्तीय आणि चालू खात्यावरील तूट जास्त असल्यामुळे या संस्थेने भारताचे पतमानांकन वाढविले नाही, असे स्पष्टीकरण केले आहे.
भारताची चालू खात्यावरील तूट जास्त असतानाच अमेरिकेने भारताविरोधात 50 टक्के आयात शुल्काची घोषणा केलेली आहे. यामुळे चालू खात्यावरील दबाव आणखी वाढू शकतो. अशा परिस्थितीत रुपयाच्या मूल्यावर दबाव येऊन आयातीचा खर्च वाढू शकतो. या कारणामुळे सध्या तरी भारताचे पतमानांकन वाढविणे शक्य नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात एस अँड पी या पतमानांकन संस्थेने भारताचे पतमानांकन वाढवून बीबीबी या सकारात्मक पातळीवर आणून ठेवले होते. अठरा वर्षानंतर या कंपनीने भारताचे पतमानांकन वाढविले होते. याशिवाय या वर्षाच्या सुरुवातीला मॉर्निंग डीबीआरएस या संस्थेने भारताचे पतमानांकन वाढवून बीबीबी या सकारात्मक पातळीवर आणले होते.
देशांतर्गत बाजारपेठ आणि सरकारने केलेली पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक या कारणामुळे भारताचा विकासदर 6.5% या जगातील सर्वात जास्त पातळीवर आहे. दरम्यानच्या काळात भारत सरकारने महत्त्वाकांक्षी जीएसटी सुधारणा जाहीर केल्या आहेत. या सुधारणाची अंमलबजावणी केल्यास दिर्घ पल्ल्यात भारतातील उद्योग विषयक परिस्थिती सकारात्मक होण्याची शक्यता आहे.
मात्र दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकेच्या व्यापार शुल्काचे आव्हान भारतीय अर्थव्यवस्थेसमोर असणार आहे. अशा परिस्थितीत भारताने अंतर्गत कार्यक्षमता वाढवून निर्यात वाढविण्यासाठी पर्यायी उपाययोजना करण्याची सूचना या संस्थेने केली आहे.





