अमेरिकेच्या 50% आयात शुल्कानंतरही भारताचा विकासदर झेपावणार! ‘फिच’ने वाढवला अंदाज, महागाईही नियंत्रणात

मुंबई – अमेरिकेने भारताविरोधात 50 टक्के आयात शुल्क लावल्यानंतर त्याचा भारतीय विकास दरावर लघु पल्ल्यात अंशतः परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. दरम्यानच्या काळात भारताने जीएसटी कपातीसह इतर उपाययोजना केल्या आहेत. अशा परिस्थितीत भारताचा विकास दर कमी होणार नाही तर वाढून 6.9% होईल असा अंदाज फिट्च या जागतिक पतमानांकन संस्थेने जाहीर केला.
विशेष म्हणजे या अगोदर या संस्थेने भारताचा विकासदर 6.5% राहील असे भाकीत केले होते. म्हणजे अमेरिकेच्या आयात शुल्कानंतर भारताचा विकासदर कमी होण्याऐवजी वाढणार असल्याचे या संस्थेला वाटते. दुसर्या तिमाहीत भारताचा विकासदर 6.7% राहिल असे या संस्थेने म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात हा विकासदर 7.8% इतका भरला आहे. त्यामुळे सर्वांचेच अंदाज चुकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दुसर्या तिमाहीत सेवा क्षेत्राचा विकास दर तब्बल 9.3% भरला आहे. त्याचबरोबर खासगी आणि सार्वजनिक क्षेत्राकडून खरेदी वाढली आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राचे परचेसिंग मॅनेजर इंडेक्स उच्चांकी पातळीवर आहेत. या बाबीची दखल घेऊन या संस्थेने भारताचा चालू वर्षाचा विकासदर अंदाज सकारात्मक केला आहे. या संस्थेच्या मूल्यांकनुसार आर्थिक वर्ष 2027 मध्ये म्हणजे पुढील वर्षात भारताचा विकास दर 6.3% तर 2028 मध्ये 6.2% इतका भरण्याची शक्यता आहे.
महागाई नियंत्रणात राहणार
चांगला पाऊस आणि कृषी क्षेत्राच्या उत्पादकतेत वाढ झाल्यामुळे जुलै महिन्यातील किरकोळ महागाईचा दर 1.6% इतका नोंदला गेला आहे. 2017 नंतर या महागाईचा दर प्रथमच इतक्या कमी पातळीवर आहे. दरम्यानच्या काळामध्ये जीएसटीमुळे विविध वस्तूंचे दर कमी होणार आहेत. अशा परिस्थितीत महागाई वाढण्याची शक्यता नाही. 2026 च्या अखेरपर्यंत महागाई चार टक्क्याच्या दरम्यान राहील असे मत या संस्थेने व्यक्त केले आहे.





