नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतून आज (मंगळवार) एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 31 जवळ असलेल्या एका इमारतीला दुपारी आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) च्या अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली. २० मिनिटांत आगीवर नियंत्रण – डीएफएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या घरगुती वस्तूंना ही आग लागली होती. दुपारी १ वाजून ५१ मिनिटांनी या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी सांगितले की, २० मिनिटांत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले. डीएफएस अधिकाऱ्यांनी सांगितले, “आम्ही अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पाठवल्या आणि दुपारी २ वाजून १५ मिनिटांपर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली.” मोहन गार्डन परिसरातही आग दरम्यान, पश्चिम दिल्लीतील मोहन गार्डन परिसरातही आग लागल्याची घटना समोर आली आहे. दिवाळीच्या रात्री येथे चार मजली निवासी इमारतीमध्ये आग लागली होती. मात्र, तातडीने बचावकार्य करत तेथून सात लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. पीसीआरला मोहन गार्डन येथील एका घरात आग लागल्याची माहिती रात्री ९.४९ वाजता मिळाली. सात लोकांचे प्राण वाचवले पोलीस उपायुक्त (द्वारका) अंकित सिंह यांनी सांगितले, “इमारतीमधून एकूण तीन कुटुंबांतील सात लोकांना वाचवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान पोहोचण्यापूर्वी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आसपासच्या लोकांनी दोरीच्या सहाय्याने चार लोकांना वाचवले.” त्यांनी सांगितले की, उर्वरित तीन लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी घरातून बाहेर काढले. डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, वाचवण्यात आलेल्यांमध्ये हरविंदर सिंह (३४), त्यांची पत्नी प्रिया (२७), वीरेंद्र सिंह (३२), त्यांची पत्नी प्रेमवदा, राखी कुमारी (४०), आणि त्यांची मुले वैष्णवी सिन्हा (१५) आणि कृष्णा सिन्हा (१०) यांचा समावेश आहे. हे सर्वजण सुरक्षित आहेत.