हरिद्वार – उत्तर प्रदेशात व लगतच्या उत्तराखंडमध्ये करोनाचा कहर सुरू असताना कुंभमेळ्याला परवानगी दिली जाण्यावरून टीका सुरू असताना आता अखेर कुंभमेळा पार पडलेल्या हरिद्वारसह उत्तराखंडमधील चार शहरांमध्ये करोना कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशातील आणि राज्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, हरिद्वार, रुरकी, लक्सर, भगवानपूर या शहरात बुधवारी सायंकाळी 5 वाजेपासून करोना कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. 3 मेपर्यंत कर्फ्यू असणार आहे.
करोनामुळे हरिद्वार जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी याची घोषणा केली.या काळात वैद्यकीय सेवांसह अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आलेली आहे.
कुंभमेळ्यामुळे हरिद्वारमधील करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात दररोज 1 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत असून, दररोज दहा जणांचा मृत्यू होत आहे. सध्या करोनाचा संसर्ग होणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, करोनाचा प्रसार रोखण्यासाठी 3 मेपर्यंत करोना कर्फ्यू लावण्यात येत असल्याची घोषणा केली.