अहमदाबाद- ज्या राज्यात निवडणुका होत आहेत त्या राज्यांत सर्रास प्रक्षोभक वक्तव्ये करण्याचे व लोकांची दिशाभूल करण्याचे सत्रच भारतीय जनता पक्षाने अवलंबले आहे, असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर केला आहे. आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला.
ते म्हणाले की, आज गेली 27 वर्षे या राज्यात भाजपची सत्ता आहे. पण येथे आता कॉंग्रेस सत्तेवर येणार असल्याची जाणिव त्यांना झाल्याने पंतप्रधान व गृहमंत्री कॉंग्रेसच्या विरोधात प्रक्षोभक आणि दिशाभूल करणारी भाषा वापरू लागले आहेत, असे खर्गे म्हणाले.
गुजरात हातातून जाण्याची भीती त्यांना सतावते आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. खर्गे हे पक्षाध्यक्ष या नात्याने गुजरातमध्ये कॉंग्रेसच्या प्रचारासाठी आले आहेत. त्यांनी दोन ठिकाणी प्रचाराच्या सभा घेतल्या. तसेच कॉंग्रेसच्या यंत्रणेशी निवडणुकीबाबत चर्चाही केली.