Fatal Road Accident – मुंबई–दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात शनिवार, दि.१६ रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील रहिवाशी असलेल्या दोन चालकांचा जागीच मृत्यू झाला. दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करणारा टेम्पो पुलावरून खोल दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे आंबेगाव आणि जुन्नर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात विघ्नेश अशोक शेवाळे (वय २१, रा.मंचर, ता.आंबेगाव) आणि प्रदीप शंकर खोकले (वय ३६, रा.पिंपळवंडी १४ नंबर, ता.जुन्नर) यांचा मृत्यू झाला. घोडेगाव येथील व्यापारी निळकंठ काळे यांच्या मालकीचा टेम्पो दुग्धजन्य माल घेऊन मंचरहून दिल्लीकडे रवाना झाला होता. शनिवारी सकाळी मंदसौर जिल्ह्यातील आमली परिसरात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट पुलावरून सुमारे २५ ते ३० फूट खोलदरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की वाहनाचा पूर्ण चुराडा झाला. टेम्पोमध्ये सुमारे १५ लाख रुपयांचा माल असल्याचे सांगितले जात आहे. अपघातावेळी वाहन कोण चालवत होते, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मृत विघ्नेश शेवाळे हे आदर्शगाव कुरवंडीचे ग्रामविकास अधिकारी अशोक शेवाळे यांचे पुत्र होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा पार पडला होता. अपघाताची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, घटनेनंतर टेम्पो मालक निळकंठ काळे यांनी मदतकार्यासाठी पथक रवाना केले असून, मृतांच्या नातेवाईकांनी मध्य प्रदेशातील रुग्णालयात धाव घेतली आहे.