Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक बसली आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 5 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना समृद्धी महामार्गावरील हड्स पिंपळ गाव शिवारात बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या अपघातात समीर मोहम्मद (वय 57 वर्षे) राहणार बिहार व अमीना खातून (वय 52 वर्षे) राहणार बिहार यांचा मृत्यू झाला आहे. तर प्रकाश विक्रम पाटील (वय 45) राहणार नाशिक, मोहम्मद इम्तियाज (वय 40) राहणार बिहार, गुलाबसा खातुन (वय 20) राहणार बिहार, सचिन रामदास खरे (वय 42) वर्षे राहणार नाशिक, हासीब समीर मोहम्मद (वय 37) राहणार बिहार हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर मोहम्मद या रुग्णाला घेऊन त्यांचे नातेवाईक रुग्णवाहिका क्रमांक एम एच 15 ईएफ 0089 ने नाशिक येथून पटणा येथील एम्स रुग्णालयाकडे निघाले होते. बिहारकडे जात असताना आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हडस पिंपळगाव शिवारात अज्ञात वाहनाला रुग्णवाहिकेची पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात रुग्णवाहेकेचे मोठं नुकसान झालं असून क्रेनच्या सहाय्याने रुग्णवाहिकेला रस्त्यावरुन हटविण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
जालना ते राजूर मार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू
जालना ते राजूर मार्गावरील बावणे पांगरी गावाजवळ मोटारसायकलला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात एका मुलीसह दोन जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातात प्रशांत ताराचंद पवार (वय २५) व निकिता दिगंबर राठोड (वय २५) हे दोघे जागेवरच ठार झाले.नंदिनी ताराचंद पवार (वय १८) या गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, नंदिनी पवार यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
निकिता राठोड ही मुंबई येथे पोलिस दलात शिपाई म्हणून कार्यरत होती. ती गावाकडे सुट्टीवर आली होती. हे तिघे मोटारसायकलवरून राजूर येथे दर्शन करून पारेगाव येथे जाण्यासाठी निघाले होते. ते बावणे पांगरी या गावाजवळ आले होते. त्यावेळी राजुरहून जालनाकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच. २०, एए. ७२३३) मोटारसायकलला (एमएच. २१, सीई. ४५०४) पाठीमागून जाेराची धडक दिली.




