Breking news : “दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत मिळणार, ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू होणार”; CM फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis – मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न राहिल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच, मॅन्यूअलमध्ये ओला दुष्काळ ही संकल्पनाच नाही, तरीही दुष्काळाच्या सर्व सवलती लागू केल्या जातील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस म्हणाले आहेत.
सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की, ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना, सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असे समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे, अशी माहिती ही फडणवीस यांनी दिली.
त्यामुळे, जी काही मागणी होती की सवलती लागू झाल्या पाहिजेत किंवा ओला दुष्काळ जाहीर करायचा अर्थ असतो की त्या सवलती लागू करा, तशा सगळ्या सवलती लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. सगळी नुकसानाची आकडेवारी पुढच्या दोन-तीन-चार दिवसात होईल. लवकरात लवकर, पण कुठल्याही परिस्थितीत पुढच्या आठवड्याच्या आत आपल्याला या संदर्भातला निर्णय घेणार आहोत आणि त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या 15 दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली असून मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्याचे दिसून येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी झाली आहे, यासंदर्भात आढावा घेतला असून 60 लाख हेक्टरवरती नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी, पहिल्या टप्प्यात आपण 2115 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरीत करण्याची कामे सुरू झाले आहेत,असे ते म्हणाले.





