Farmers Struggle – जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात सध्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नसतानाही शेतीची कामे मात्र थांबलेली नाहीत. उन्हाचा पारा चढलेला असतानाही परिसरातील शेतकरी मोठ्या हिमतीने कांदा काढणीच्या कामात व्यस्त आहेत. आळे, संतवाडी, कोळवाडी, लवनवाडी, राजुरी, तांबेवाडी यांसह विविध गावांच्या शिवारात मजुरांच्या साहाय्याने कांदा काढणीची लगबग सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शेती थांबत नाही, हे वास्तव या कामातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यंदा कांद्याचे उत्पादन चांगले झाले असले तरी बाजारभावाने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली आहे. उत्पादनावर झालेला खर्च आणि प्रत्यक्ष मिळणारा दर यामध्ये मोठी तफावत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मात्र, काढणीला आलेला कांदा जास्त काळ शेतात ठेवणे नुकसानकारक ठरू शकते, त्यामुळे उन्हामुळे कांदा खराब होऊ नये म्हणून शेतकरी काढणीला प्राधान्य देत आहेत. सध्या दुपारी उष्णतेचा तडाखा अधिक जाणवत असल्याने मजूर आणि शेतकरी डोक्यावर टोपी, टॉवेल बांधून तसेच पाण्याची सोय सोबत ठेवून काम करत आहेत. ग्रामीण भागात सकाळपासूनच शेतात मजूर दाखल होत असून कांदा काढणी, त्याची प्रतवारी आणि गोणीत भरण्याची कामे वेगाने सुरू आहेत. कांदा बाजारभाव. भाव नसला तरी पीक काढावेच लागते, अशी हतबलता शेतकरी व्यक्त करत आहेत. बाजारभावाच्या अनिश्चिततेमुळे वाहतूक आणि मजुरीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे, तरीही मेहनतीच्या जोरावर बळीराजा पुन्हा उभा राहताना दिसत आहे. महिला वर्गाचा मोठा सहभाग परिसरात अनेक ठिकाणी महिला मजूरच मोठ्या प्रमाणावर कांदा काढणीच्या कामात असल्याचे दिसत आहे. कांदा काढणीनंतर तो शेतात सुकवणे आणि बाजारपेठेत पाठविण्याची तयारी केली जात आहे. मात्र, अत्यल्प दरामुळे मजुरी व इतर खर्च वजा जाता हातात फारसे काही उरत नसल्याची खंत या महिला कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. निसर्ग आणि बाजाराची दुहेरी कात्री सतत बदलणारे हवामान आणि बाजारातील दराची अनिश्चितता यामुळे शेतकरी चिंतेत आहे. उन्हाच्या कडाक्यात शेतात घाम गाळणारा शेतकरी आजही पुढील हंगामात चांगले दिवस येतील, या आशेवर शेती करत आहे. आळेफाटा परिसरातील हे चित्र ग्रामीण अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने स्पष्ट करणारे ठरत आहे. “बाजारभाव नसला तरी पीक काढावेच लागते, कारण शेती थांबवून चालत नाही. निसर्गाच्या लहरीपणासोबत आता बाजारातील घसरणही सोसावी लागत आहे.” – चंद्रकांत घोडके, शेतकरी, आळेफाटा