भाजप खासदार कंगना राणावतला जामीन मंजूर; शेतकरी आंदोलनावरील ‘त्या’ वादग्रस्त टिप्पणीबद्दल मागितली ‘माफी’

भटिंडा: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांना सोमवारी (२७ ऑक्टोबर २०२५) मानहानीच्या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला. २०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीवरून त्यांच्यावर हा खटला दाखल करण्यात आला होता. भटिंडा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर झाल्यानंतर कंगना राणावत यांना जामीन मिळाला.
‘गैरसमजातून’ रिट्वीट केल्याचा कंगनाचा दावा –
न्यायालयात हजर झाल्यानंतर कंगनाने प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली बाजू मांडली. “हा निव्वळ एक गैरसमज आहे,” असे त्या म्हणाल्या. “मी फक्त एक मीम (Meme) रिट्वीट केले होते आणि कोणालाही विशेषतः दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. महिंदर कौर (वादग्रस्त पोस्टमधील महिला) आज उपस्थित नसल्याने, मी त्यांच्या पतीशी चर्चा करून त्यांची माफी मागितली आहे. शेतकरी आंदोलनाच्या वेळी अनेक मीम्स फिरत होती, आणि त्यापैकीच एक मी माझ्याकडून अजाणतेपणी रिट्वीट झाले होते.”
तक्रारदाराच्या वकिलांनी आक्षेप घेतला –
यावर, तक्रारदार महिंदर कौर यांचे वकील रघबीर सिंह बहनीवाल यांनी कंगनाच्या दाव्यावर आक्षेप घेतला. “कंगना राणावत यांनी न्यायालयात सांगितले की त्यांनी चुकून रिट्वीट केले आणि कोणालाही लक्ष्य केले नाही. पण माझ्या पक्षकारांचे पती लाभ सिंह यांनी सांगितले आहे की, कंगनाने यापूर्वी कधीही त्यांची माफी मागितलेली नाही,” असे बहनीवाल म्हणाले. तसेच, “कंगनाने सुरक्षेच्या कारणास्तव वैयक्तिक हजेरीतून कायमस्वरूपी सूट मिळावी यासाठी अर्ज दाखल केला, ज्याला आम्ही विरोध केला.”
पुढील सुनावणी २४ नोव्हेंबरला –
हे प्रकरण आता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (विशेष न्यायालय) यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
या प्रकरणाचा संबंध २०२० मधील कंगनाच्या एका वादग्रस्त ट्वीटशी आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने बहादूरगड जंदियान गावच्या ज्येष्ठ शेतकरी महिला महिंदर कौर यांचा फोटो शेअर केला होता. या फोटोची तुलना त्यांनी शाहीन बाग आंदोलनाच्या प्रतीक ठरलेल्या बिलकीस बानो यांच्याशी केली होती.
कंगनाने कथितरित्या दावा केला होता की, अशा महिला आंदोलनांमध्ये सामील होण्यासाठी ‘१०० रुपयांना उपलब्ध’ असतात. या टिप्पणीमुळे मोठा गदारोळ झाला आणि महिंदर कौर यांनी जानेवारी २०२१ मध्ये मानहानीची तक्रार दाखल केली.
सर्वोच्च न्यायालयाने वैयक्तिक हजेरीतून सूट देण्यास नकार दिल्यानंतर कंगना यांना आज न्यायालयात हजर राहावे लागले. यापूर्वी, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयानेही कंगनाची केस रद्द करण्याची मागणी फेटाळली होती. न्यायालयाने समन्स बजावूनही कंगना यापूर्वी हजर झाल्या नव्हत्या. आजच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर भटिंडा पोलिसांनी न्यायालय परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून कडक सुरक्षा व्यवस्था केली होती.





