कृषी पंपाची वीज तोडल्याने ऊर्जा भवनासमोर ‘डोर्लेवाडी-झारगडवाडी’तील शेतकऱ्यांचे आंदोलन

बारामती /डोर्लेवाडी(प्रतिनिधी) : बारामती तालुक्यातील अनेक गावांतील महावितरणने कृषीपंपाची वीज खंडित केल्याने डोर्लेवाडी, झारगडवाडी गावांतील शेतकऱ्यांनी बारामतीच्या ऊर्जा भवन कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत तोडलेली वीज पूर्ववत केली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्र आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला होता.
गेटसमोर समोर शेतकऱ्यांना दोन तास ठिय्या मांडला यावेळी वीज आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, वीज खंडित करणाऱ्या महावितरणचा निषेध असो अश्या घोषणा देऊन कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. यावेळी डोर्लेवाडी झारगडवाडी गावातील अविनाश काळकुटे, निलेश कालगांवकर, दादा नाळे, दत्तात्रय नवले, महादेव नेवसे, रत्नसिह कालगांवकर, गजानन नाळे, प्रवीण फडतरे, रणजित झारगड, दिगंबर भोपळे, पदमनाथ निकम, सुखदेव निकम, दयाराम महाडिक आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डोर्लेवाडी, झारगडवाडी येथील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज गेली तेरा दिवसापासून महावितरण कडून खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतीतील फळबागांचे, पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
त्यातच कोरोनाचे संकट शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला हमीभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला शेतीपंपाचे बिल भरण्याची परिस्थिती नाही. तरी सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी महावितरणने घ्यावी. तसेच भरमसाठ हजारो लाखो रुपयांची आलेली वाढीव व बोगस बिले महावितरण तातडीने दुरुस्त करावीत. अशी मागणी करत आंदोलन शेतकऱ्यांनी ऊर्जा भवन कार्यालयासमोर आपला महावितरण विषयीचा संताप व्यक्त केला. मात्र महावितरण आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या चर्चेदरम्यान वीज जोडणीचा तोडगा निघाला.
शासन म्हटलं तर शेतकऱ्यांचे वीज पूर्ववत करणार..
काहीही पैसे न भरता खंडित केलेली वीज पूर्ववत करा असं कोणाच्याही अधिकारांमध्ये नाही. जे शेतकरी वीज बिलाचे काहीच पैसे भरणार नाहीत, त्यांचे कृषीपंप आणि स्टार्टर जप्त करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. एका डीपी वर दहा शेतकरी असतील तर त्यातील सहा जणांनी 20 ते 30 टक्के वीज बिल भरणा करणे आवश्यक आहे. तरच वीज जोडणी केली जाईल आणि जे भरणार नाही त्याची वीज तोडली जाईल. मात्र आता 3 एचपी मोटर पंपाला तीन हजार आणि 5 एचपी मोटर पंपाला पाच हजार रुपये भरण्याच्या अटीवर महावितरण कडून वीज जोडणी करणार असल्याचे धनंजय गावडे ( ग्रामीण महावितरण उपविभागीय अभियंता ) यांनी सांगितले.




