Faisal Patel : काँग्रेस दिशाहीन झाली आहे; फैजल पटेल यांची टीका

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष संपूर्णपणे दिशाहीन झाला आहे. काॅंग्रेसचे नवे नेतृत्व ना धड नवीन आहे ना जुने. पक्षाकडे नव्या युगाचा कोणताही दृष्टीकोन नाही. त्यापेक्षा विद्यमान केंद्र सरकारचे काम उत्तम सुरु आहे, असे फैजल पटेल यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे फैजल पटेल हे चिरंजीव आहेत. त्यांनी आपल्या ताज्या विधानात भाजपाप्रणित रालोआ सरकारची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेशी झालेल्या मुलाखतीत फैजल पटेल म्हणाले की, काँग्रेस स्वतःच्या जगात धावत आहे. ते दिशाहीन आहेत आणि भाजपला हेच हवे आहे. भाजप इतर सर्व राजकीय पक्षांना बंद करून आपले पूर्ण नियंत्रण प्रस्थापित करू इच्छिते. मी स्वत: काँग्रेस पक्षावर नाराज नाही. संपूर्ण काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब असून आणि पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. मी अजूनही काँग्रेस पक्षात आहे आणि मी अद्याप काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. मी काही काळासाठी सार्वजनिक जीवनातून ब्रेक घेतला आहे.
फैजल पटेल यांनी राहुल गांधींचे कौतुक केले आणि म्हटले की, राहुल गांधी हे एक मेहनती नेते आहेत. काँग्रेसमध्ये शशी थरूर, डीके शिवकुमार, रेवंत रेड्डी, दीपेंद्र हुडा आणि सचिन पायलट असे काही अतिशय प्रतिभावान आणि बुद्धिमान नेते आहेत. ते खूप सक्षम नेते आहेत. पक्षात काही अंतर्गत समस्या आहेत. माझा असा विश्वास आहे की पक्ष चालवणाऱ्या वरिष्ठ नेत्यांना योग्य सल्ला दिला जात नाही.
देश आजही सुरक्षितच
आपल्या सुरक्षा दलांमुळेच भारत देश सुरक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, डॉ. एस. जयशंकर, अमित शाह, राजनाथ सिंह आणि सुधांशू त्रिवेदी इत्यादींसह सध्या देश चालवणारे कठोर परिश्रम करत आहेत. महागाई, बेरोजगारी इत्यादी आपल्या स्वतःच्या समस्या आहेत, परंतु हे लोक चांगले काम करत आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये सशस्त्र दलांनी उत्तम काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तम नेतृत्व क्षमता दाखवली आणि आम्हाला मोठ्या संकटातून बाहेर काढले. ही खूप मोठी गोष्ट आहे. मला आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. मला जयशंकर यांच्याबद्दल खूप आदर आहे. पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने नोकरशहांची निवड करतात आणि नंतर त्यांना नेते बनवतात आणि त्यांना मंत्र्यांमध्ये नियुक्त करतात ती खूप चांगली गोष्ट आहे.





