Rajarambapu Patil Sugar Factory : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे नाव रातोरात बदलण्यात आल्याची धक्कादायक घडला समोर आली आहे. या घटनेमुळे सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. काही अज्ञात सभासदांंनी रात्रीत नाव बदल्याची माहिती मिळत आहे. ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ या नावाचा नवा फलक कारखान्याच्या कमानीवर लावला आहे. या घटनेमुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जतच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना दिला होता. त्यानंतर कारखान्याचे नाव बदल्याची घटना घडल्याने राजकारण तापले आहे. कारखान्याचे नाव बदलण्यात आल्याच्या घटनेने पुन्हा एकदा पडळकर-पाटील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कोंडी करण्याची प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. दरम्यान, या धक्कादायक प्रकारामुळे सांगली जिल्ह्यातील राजकारण आणखी तापणार असल्याचे बोलले जात आहे. जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला आव्हान देणारे हे कृत्य असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. राजे विजयसिंह डफळे कोण? राजे विजयसिंह डफळे हे जत संस्थानाचे शेवटचे राजे होते. (इ.स. १९२८-१९४८) आणि त्यांच्या नावाने अनेक संस्थांची स्थापना झाली आहे. यात प्रामुख्याने राजे विजयसिंह डफळे साखर कारखान्याचा देखील समावेश होता. हा कारखाना जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कष्ट करून उभा केला होता. गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते? तुम्हाला जतची इतकी चिंता आणि काळजी आहे तर मग जतचा साखर कारखाना सभासदांना देऊन टाका. नाही तर मी जत तालुक्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनीट क्रमांक चारचे धुराडे पेटू देणार नाही, मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे, प्रसंगी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई करणार असल्याचा गर्भित इशारा गोपीचंद पडळकरांनी दिला होता. हा कारखाना सभासदांना परत केल्याशिवाय तो सुरू होऊ देणार नसल्याचे देखील पडळकर म्हणाले होते. हेही वाचा : पुन्हा जोर वाढला! पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे; महाराष्ट्रातील तब्बल २६ जिल्ह्यांना अलर्ट जारी, पाहा तुमच्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?