कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला तरीही अपघातात ट्रकचालकही जबाबदार; कुटुंबियांना मिळाले ६६ लाख ७० हजार, न्यायालयाचा निर्ष्कर्ष एकदा पाहा….

पुणे : जरी पोलिसांनी मयत कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तरीही असलेल्या पुराव्यावरून ट्रक चालकही अपघातास जबाबदार आहे, असा निष्कर्ष काढत मयत व्यक्तीच्या वारसांचा क्लेम अंशत: मुंबई उच्च न्यायालयाने मंजुर केला.
या निकालाच्या आधारे वसुलीसाठी त्या व्यक्तीच्या वारसांनी दाखल केलेल्या दर्खास्त अर्जावर लोकअदालतमध्ये तडजोड झाली. कुटुंबियांनी ६६ लाख ७० हजार रुपये मिळाले.
२०१२ साली कर्ता गमावलेल्यांना कुटुंबियांना एका तपानंतर म्हणजे २०२४ साली न्याय मिळाला आहे. अर्जदारांतर्फे अॅड.जी.पी.शिंदे आणि अॅड. सतिश घरत यांनी काम पाहिले. तर विमा कंपनीतर्फे अॅड. शशिकला वागदरीकर यांनी काम पाहिले.
अभय शत्रुघ्न चौंडे (वय ४१) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. अभय २१ फेब्रुवारी २०१२ रोजी कारमधून पुण्यातून बारामतीकडे चालले. त्यावेळी केडगाव चौफुला रस्त्यावर कार आणि ट्र्कची समोरासमोर धडक झाली. यामध्ये कारचालक अभय यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी मयत अभय यांच्याविरोधातच गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अभय यांची पत्नी श्रेया, मुलगा कोविद आणि आई सुमती यांनी १ मार्च २०१४ रोजी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी ट्रक चालक, मालक व ट्रकची विमा कंपनी चोलामंडलम इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात दावा दाखल केला.
ते विद्या प्रतिष्ठान येथे असिस्टंट प्राध्यापक होते. त्यांना दरमहा ६० हजार रुपये पगार होता. पगार आणि अवलंबत्वाचा विचार करून नुकसान भरपाईची मागणी दाव्यात केली.
मात्र, कार चालकाचीच चुक असल्याचा निष्कर्ष काढत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने फेब्रुवारी २०२० मध्ये हा दावा फेटाळला. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यात आले. ते अपील अंशता मान्य करत उच्च न्यायालयाने मार्च २०२४ मध्ये वरीलअदेश दिला. या अर्जानंतर वसुलीसाठी दर्खास्त अर्ज दाखल केला होता.
तब्बल १२ वर्षाच्या संघर्षानंतर कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे. तो न्याय मिळवून दिल्याचा आनंद वाटत आहे.
– अॅड. जी.पी.शिंदे, अर्जदारांचे वकील





