Tanaji Sawant News : शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली होती. मात्र, आता या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला असून, पोलिसांनी यासंबंधीचा तपास पूर्ण करत कोर्टात ‘बी फायनल’ अहवाल सादर केला आहे. या अहवालात अपहरणाचा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट झाले असून, प्रकरणाची फाइल बंद करण्यात आली आहे. काय होते प्रकरण? 10 फेब्रुवारी 2025 रोजी माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, त्यांचा 32 वर्षीय मुलगा ऋषिराज सावंत याचे अपहरण झाले आहे. एका अनामिक फोन कॉलनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अपहरणाचा गुन्हा नोंदवला. तपासादरम्यान असे समोर आले की, ऋषिराज यांनी आपल्या दोन मित्रांसह (प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर) खासगी चार्टर्ड विमानाने बँकॉकला जाण्याचा प्लॅन आखला होता. विशेष म्हणजे, त्यांनी ही बाब कुटुंबाला कळवली नव्हती. पुणे पोलिसांनी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी उड्डाण संचालनालय (DGCA) यांच्याशी समन्वय साधत अंदमान-निकोबार बेटांजवळून (पोर्ट ब्लेअर) बँकॉकला जाणारे चार्टर्ड विमान परत पुणे विमानतळावर बोलावले. विमान परतल्यानंतर ऋषिराज आणि त्यांच्या मित्रांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) ताब्यात घेतले. तपासात स्पष्ट झाले की, ऋषिराज हे खासगी कामानिमित्त बँकॉकला जात होते आणि कोणतेही अपहरण झाले नव्हते. गैरसमजातून उडाली खळबळ ऋषिराज यांनी घरी कोणालाही न कळवता बँकॉकला जाण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे त्यांचे वडील तानाजी सावंत यांना अपहरणाचा संशय आला. तानाजी सावंत यांनी स्वतः पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात हजर राहून कारवाईसाठी पाठपुरावा केला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधला होता. यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत विमान परत बोलावले. मात्र, नंतर हे प्रकरण गैरसमजातून उद्भवल्याचे स्पष्ट झाले. ऋषिराज यांचे मोठे बंधू गिरीराज सावंत यांनी सांगितले की, ऋषिराज यांनी दुपारी 3:30 वाजता आपण दोन दिवसांच्या प्रवासाला जात असल्याचा मेसेज पाठवला होता. मात्र, त्यांनी फोन बंद केल्याने कुटुंबाला चिंता वाटली. गिरीराज यांनी याला कौटुंबिक गैरसमज ठरवत, वडिलांच्या कारवाईचे समर्थन केले. ‘बी फायनल’ अहवालाने प्रकरणाला पूर्णविराम पाच महिन्यांच्या तपासानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणात कोणतेही अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. संयुक्त पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले की, ऋषिराज यांनी स्वतःच्या इच्छेने बँकॉकला जाण्याचा निर्णय घेतला होता आणि यामागे कोणताही गुन्हा नव्हता. यामुळे पोलिसांनी कोर्टात ‘बी फायनल’ अहवाल सादर करत हे प्रकरण बंद केले आहे. ‘बी फायनल’ अहवालाचा अर्थ असा की, तपासात गुन्हा सिद्ध झाला नाही आणि पुढील कारवाईची आवश्यकता नाही.