प्रभात वृत्तसेवा पवनानगर – मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा निर्धार व्यक्त करत २९ ऑगस्ट रोजी मुंबईकडे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाचे नेतृत्व मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील करणार असून, त्याच्या अनुषंगाने गणेश मंदिरात शनिवारी (दि. २६) मराठा समन्वयकांची बैठक पार पडली. बैठकीत मोर्चा यशस्वी करण्यासाठी नियोजन, प्रचार आणि सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला. मोर्चात अधिकाधिक संख्येने मराठा बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी समन्वयकांकडून करण्यात आले.२९ ऑगस्टचा मोर्चा मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी निर्णायक ठरणार असून, राज्य सरकारवर दबाव वाढवण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे, असे मतही बैठकीत मांडण्यात आले. या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यासह पवनानगर परिसरातील मराठा बांधवांमध्ये उत्साह आणि जागरूकता वाढत आहे. मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी विविध गावांमध्ये बैठका आणि जनजागृती मोहिमा राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पवन मावळ परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते.