मुंबई – गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राज्य सरकारने 1 ते 5 डिसेंबर रोजी पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र या निर्णयावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. गुजरातमध्ये निवडणुका मग महाराष्ट्रातील कामगारांना सुट्टी का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईत येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, सरकारने काय करावं हा सरकारचा निर्णय आहे. परंतु शेजारच्या राज्यात निवडणूक आहे, त्यामुळे आपल्या राज्यातील काही ठरावीक जिल्ह्यात सुट्टी हे पहिल्यांदा पाहिले आहे. दर पाच वर्षांनी निवडणूका येतात, पण मला नाही आठवत की, राज्य सरकारमध्ये काम करत असताना सुट्ट्या दिल्या. त्यावेळी मध्यप्रदेश, गोवा आणि कर्नाटकात निवडणुका झाल्या. मात्र आम्ही कधी अशी पगारी सुट्टी दिली नाही.
देशाच्या पार्लमेंटच्या निवडणूक असताना सर्वांना सुट्टी देणे एकवेळ समजू शकतो. पण अशाप्रकारे आदेश पहिल्यादाचं पाहायला मिळाले, पगारी सुट्टी दिली, अशाप्रकारे पायंडे पडले जात असतील तर ते चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला पंडित नेहरूच जबाबदार – सुधीर मुनगंटीवार
समविचारी पक्षांबरोबर चर्चेस तयार
मतांची विभागणी टाळण्यासाठी समविचारी पक्षांबरोबर येण्याची आमची तयारी आहे. मात्र, दोन्हीबाजूने तयारी असावी लागते. राज्यात आंबेडकर गट, गवई गट, कवाडे गट, आठवले गट आहेत. यातील अनेकांबरोबर आघाडी करून निवडणुका लढल्या आहेत. रामदास आठवले यांची केंद्रात मंत्री होण्यापूर्वी आमच्याबरोबर आघाडी असायची. आर आर पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा केली होती. त्यामुळे आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.