मुंबई – विधानसबभा निवडणुकांच्या रात्री राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप घडला. सेनेचे २० पेक्षा अधिक आमदारांनी मतदान उरकल्यांनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली थेट सुरत गाठलं. महाविकास आघाडीतून बाहेर पडा. हिंदुत्वाच्या विचारावर भाजपसोबत सरकार स्थापन करा अशी मागणी बंडखोर गटाने केली. एकेक करून शिवसेनेचे जवळपास ४० आमदार शिंदे गटात सामील झाले. उद्धव ठाकरे यांना हे बंड मोडण्यात सपशेल अपयश आल्याने अखेर त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले.
भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले. एकीकडे पक्षामध्ये उभी आडवी फूट पडली असतानाच उद्धव ठाकरे आता डॅमेज कंट्रोलसाठी मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण शिवसेनेमध्ये असून शिवसैनिक आपल्यासोबतच असल्याचं सांगत आहेत.
आणखी एक भूकंप? “भाजप आमची शत्रू नाही; भविष्यात काय होईल…” – दीपाली सय्यद यांच्या ट्विटमुळे चर्चा
अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक प्रश्न उत्तरं दिली आहेत. मुलाखतीदरम्यान त्यांना उद्धव ठाकरेंनी पुन्हा सोबत येण्याची हाक दिल्यास जाणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी, “ज्या प्रकारे आमच्यावर आरोप करत आहेत, पक्षातून काढलं आणि दुसरीकडे चर्चेसाठी माणसं पाठवली. आमचे पुतळे जाळण्यात आले, बदनामी करत आहेत, खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे ते पाहता त्यांना अशी अपेक्षा असेल असं वाटत नाही”.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये भाषण केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी, ‘काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. तिला ब्रेक नव्हता. त्यामुळे अपघात तर होणार नाही ना असे टेन्शन सगळ्यांच्या चेहऱ्यावर होते’ असा चिमटा काढला होता. यावर शिंदे यांनी तातडीने प्रत्युत्तर देत, ‘रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे,’ असे ट्विट केले.
नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला तातडीने प्रत्युत्तर दिल्याने त्यांच्यातील दुरावा वाढत चालल्याचे सूचित होत आहे.