Eknath Shinde : ठाकरेंच्या ‘ऑपरेशन तुडावा’वर एकनाथ शिंदेंचं खुलं आव्हान; म्हणाले…
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. ठाकरेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी केल्याच्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. ठाकरेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी केल्याच्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांविरोधात ‘ऑपरेशन तुडवा’ राबवण्याचा इशारा देत, मतदारसंघात हे खासदार दिसताच त्यांना तुडवा, असा थेट आदेश कार्यकर्त्यांना दिला होता.
राऊत यांच्या याच विधानाचा खरपूस समाचार घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांना थेट आणि खुले आव्हान दिले आहे.
‘तो तर कंपाऊंडर, तो काय ऑपरेशन करणार?’ शिंदेंचा राऊतांवर घणाघात
संजय राऊत यांच्या ‘ऑपरेशन तुडवा’ या इशाऱ्यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत बोचरी आणि सडकून टीका केली. ते म्हणाले, “काही लोक म्हणत आहेत की आम्ही लांडग्यांचे ऑपरेशन करतो. परंतु, बोलणारा माणूस तर स्वतः एक कंपाऊंडर आहे. एक कंपाऊंडर कसे काय ऑपरेशन करू शकतो? इथे आमचे श्रीकांत शिंदे हे खरे डॉक्टर आहेत आणि मी स्वतः डॉक्टर नसलो तरी अजूनही अनेक मोठी राजकीय ऑपरेशन्स यशस्वीपणे करतो. पण लक्षात ठेवा, कोणतीही ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्यांचं नाही. वाघाचं कातडं पांघरल्याने कोणताही लांडगा कधी वाघ होत नसतो.”
आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी पुढे सांगितले की, “चार वर्षांपूर्वी याच लांडग्यांनी मला धमक्या दिल्या होत्या. मला सांगण्यात आले होते की तुम्हाला मुंबईत यावंच लागेल आणि वरळीतून जावंच लागेल. मुंबई काय कोणाची जहागीर आहे का? एकनाथ शिंदे तेव्हा कोणालाही न घाबरता एकटा आला होता. मी विमानतळावर उतरल्यानंतर हेलिकॉप्टर बाजूला ठेवले आणि गाडीने बायरोड थेट वरळीत जाऊन थांबलो.”
‘हिम्मत असेल तर समोर या’ – उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
शिंदेंनी ठाकरे गटाला थेट आव्हान देत म्हटले की, “तेव्हा मला धमक्या देणारे स्वतः घरात बसून मला ऑनलाईन पाहत होते. आणि आता ते ‘तुडवा ऑपरेशन’ राबवण्याच्या वल्गना करत आहेत. जर हिम्मत असेल तर समोर या. रामदास कदम यांनी म्हटल्याप्रमाणे, आमचे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? आमचे शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या विचारांचे खरे आणि कडवे शिवसैनिक आहेत. सकाळी उठून आपल्याच खासदारांना शिव्या द्यायच्या आणि संध्याकाळी त्यांना चांगले म्हणायचे, असा धंदा आम्ही करत नाही. सेनापतीने कधीही घरात बसून राहायचे नसते, तर मैदानात समोर येऊन लढावे लागते,” अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रहार केला.
‘हा एकनाथ शिंदे लढवय्या आहे’
आपल्या भाषणाचा शेवटी त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त करताना सांगितले की, “हा एकनाथ शिंदे नेहमी छातीचा कोट करून लढणारा लढवय्या आहे. यांच्या हातातून आता महापालिका, ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदाही गेल्या आहेत. मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे म्हणूनच त्यांनी मुंबईवर पूर्ण जोर लावला होता.
परंतु, जनतेने त्यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून महायुतीला पसंती दिली आहे. आम्ही मुंबईत १०० टक्के काँक्रिटचे रस्ते करत आहोत. महाविकास आघाडीच्या काळात बंद पडलेली मेट्रो आम्ही सुरू केली, समृद्धी महामार्ग आणि कोस्टल रोडचे काम वेगाने पूर्ण केले. याच विकासकामांच्या जोरावर जनतेने महायुतीला विजय मिळवून दिला आहे.”
दिल्लीतील राजकारणावर बोलताना त्यांनी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीवरही निशाणा साधला. “त्यांची दिल्लीतील इंडिया आघाडी पूर्णपणे बुडाली आहे. कितीही शून्य एकत्र आले, तरी त्यांची अंतिम बेरीज ही नेहमी शून्यच येते,” असा सणसणीत टोला लगावत शिंदेंनी (Eknath Shinde)ठाकरे गट आणि विरोधकांचा समाचार घेतला. या जाहीर आव्हानामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.






