प्रभात वृत्तसेवा बेल्हे – पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर व दौंड तालुक्यांमध्ये दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत असून, मानव-बिबट संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनाची धडपड वाढली आहे. ऊसाचे विस्तीर्ण क्षेत्र, डोंगराळ भूभाग व दाट लपणामुळे बिबट्यांना सहज आश्रय मिळत असल्याने संघर्षाची शक्यता वाढत आहे.जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात जुन्नर, ओतूर, शिरूर, घोडेगाव, मंचर, राजगुरुनगर व चाकण या वनपरिक्षेत्रांचा समावेश होतो. मानव व बिबट यांच्यातील संघर्ष कमी करण्याबरोबरच बिबट्यांचे शास्त्रीय व्यवस्थापन करण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कलापथकांच्या माध्यमातून विविध गावांमध्ये व शाळांमध्ये सुमारे 55 जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच विषयतज्ज्ञ श्री. सौमित्र यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 50 गावांमध्ये ग्रामपंचायत पदाधिकार्यांच्या उपस्थितीत बिबट जनजागृती व वनविभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. बिबट हल्ल्यांपासून घ्यावयाच्या खबरदारीसाठी पोस्टर, घडीपत्रके व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या काळात बिबट नसबंदी, शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण, स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या धर्तीवर स्पेशल लेपर्ड प्रोटेक्शन फोर्स, बिबट्यांचे इतर संरक्षित क्षेत्रात स्थानांतरण व नवीन चार बिबट निवारा केंद्रांची निर्मिती प्रस्तावित आहे. 185 बिबट-बछडे पुनर्मिलन सन 2020-21 ते 2025-26 या कालावधीत तब्बल 185 बिबट-बछड्यांचे पुनर्मिलन यशस्वीरीत्या करण्यात आले आहे. गावपातळीवर वनकर्मचार्यांमार्फत नियमित गस्त, नागरिकांचे प्रबोधन, स्थानिक लोकांच्या सहभागातून जलद बचाव पथके तयार करून गस्त व जनजागृती करण्यात येत आहे. एआय प्रणाली व ड्रोन गस्त बचाव पथक व माणिकडोह बिबट निवारा केंद्राच्या समन्वयाने वन्यप्राणी रेस्क्यूची कार्यवाही करण्यात येत आहे. प्राथमिक बचाव पथकातील 400 सदस्य कार्यरत असून, शिरूर व मंचर वनपरिक्षेत्रातील 55 ठिकाणी एआय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. एआयचा वापर करणारा जुन्नर वनविभाग राज्यातील पहिला वनविभाग ठरला आहे. ‘बिबट कृती दल’ बेस कॅम्प अतिसंवेदनशील गावांमध्ये 24ु7 जनजागृतीसाठी ‘बिबट कृती दल’ स्थापन करण्यात आले आहे. पिंपरखेड, न्हावरा, भीमा कोरेगाव (ता. शिरूर), आळे, नगदवाडी (ता. जुन्नर) व गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे हे बेस कॅम्प कार्यरत असून, मागील दोन वर्षांत शिरूरच्या पश्चिम भागात तसेच आंबेगाव व जुन्नरच्या पूर्व भागात मानव-बिबट संघर्ष मोठ्या प्रमाणात नियंत्रित झाला आहे. पायाभूत सुविधा व प्रस्तावित योजना एकटी घरे व गोठ्यांसाठी सौर कुंपण, मेंढपाळ व ऊसतोड कामगारांना सौर दिवे व टेन्ट, एकूण 400 पिंजरे कार्यान्वित असून त्यामधून आतापर्यंत 75 बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. आपदा मित्र व प्राथमिक बचाव दल सदस्यांना प्रशिक्षण, नागरिकांना नेक गार्डचे वाटप, अनायडर्स मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे.