उन्हाळा तसेच पाणीटंचाईच्या भीतीने पोल्ट्री व्यावसायिक थंड
शेरखान शेख
शिक्रापूर – सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तापमानदेखील उच्चांक गाठत असल्याचे चित्र दिसत असून, त्याचा परिणाम शेती व कुक्कुटपालनवर होत आहे. पाणीटंचाई व उन्हाची तीव्रता यामुळे अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी त्यांचे शेड मोकळे ठेवले आहेत. बॉयलर कोंबड्या मिळणे अशक्य होत असल्याने बॉयलर चिकनचे बाजारभाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे चिकन खाणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे.
सण, उत्सव तसेच यात्रेचे दिवस सुरू झाल्यामुळे एकीकडे सर्वत्र चिकनला मागणी वाढत आहे, तर दुसरीकडे काही वर्षांपूर्वी झळ बसलेले सर्व पोल्ट्री व्यावसायिकांनी आर्थिक झळ नको म्हणून पोल्ट्रीचे शेड मोकळे ठेवणे पसंत केल्यामुळे बाजारात बॉयलर कोंबड्या मिळणे कठीण झाले आहे. एक महिन्यापूर्वी 150 रुपये किलोने विक्री केल्या जाणाऱ्या चिकनचे भाव सध्या दोनशे चाळीस रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. मात्र, कोठेही कोंबड्या शिल्लक नसल्यामुळे चिकन दुकानदारांना माल देणाऱ्या एजंट लोकांची चांगलीच दमछाक होत आहे, परंतु आपला व्यवसाय टिकविण्यासाठी प्रत्येकजण अतोनात प्रयत्न करताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी बॉयलरला बाजारभाव नव्हता.मात्र, कोंबड्यांना दिली जाणारी औषधे व खाद्य महाग होत होती, त्यामुळे खर्च जास्त व बाजारभाव कमी अशी अवस्था झालेली होती. दरम्यान, सर्वच ठिकाणी पोल्ट्रीतील शेड फूल भरलेले होते, परंतु दर कमी होत होता, मात्र सध्या बाजारभाव जास्त असताना पोल्ट्री व्यावसायिकांकडे कोंबड्या शिल्लक नाहीत. त्यामुळे चणे आहेत तर दात नाहीत अन् दात आहेत तर चणे नाहीत, अशी अवस्था पोल्ट्री व्यावसायिकांची झाली आहे. मात्र पुढील काळात बाजारात कोंबड्या उपलब्ध न झाल्यास यापेक्षादेखील जास्त भाव होण्याची शक्यता अनेक पोल्ट्री व चिकन व्यावसायिकांनी वर्तवली आहे.
कोंबड्या उपलब्ध नसल्याने भाव वाढला…
सध्या अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांचे शेड मोकळे ठेवलेले आहेत, तर यापूर्वी दर कमी असल्याने कंपन्यांनी शेडमध्ये पक्षी कमी केलेले होते, त्यामुळे सध्या कोंबड्या शिल्लक नाहीत. त्याचा परिणाम बाजारभावावर झाल्याने दर वाढल्याचे शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा परिसरात कोंबड्या पुरवठा करणारे होलसेल विक्रेते व व्यवसायिक आबा भगत तसेच इरफान मुलाणी यांनी सांगितले.
दरवाढीमुळे ग्राहकांवर परिणाम…
चिकनचे दर वाढल्याने ग्राहक कमी होत आहेत. ठराविक ग्राहकच चिकन घेण्यास येत आहेत. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याचे शिक्रापूर येथील आयन चिकन सेंटरचे संचालक सिकंदर शेख यांनी सांगितले.