E Waste Management: ई-कचरा व्यवस्थापनासाठी यंत्रणेचा अभाव! शहरात वर्षाला तब्बल ३ हजार टन कचऱ्याची निमिर्ती
E Waste Management: शहरात वर्षाला ३ हजार टनांपेक्षा अधिक ई-कचऱ्याची निर्मिती होत असतानाही महापालिकेकडे शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी स्वतंत्र आणि नियमित यंत्रणेचा अभाव.

E Waste Management – शहरात ई-कचऱ्याचे प्रमाण वाढत असून त्याच्या व्यवस्थापनासाठी महापालिकेकडे स्वतंत्र प्रणालीच नाही. सध्या क्षेत्रीय कार्यालयांद्वारे ठराविक कालावधीत व्ही-कलेक्ट ड्राइव्ह राबवून ई-कचरा संकलित केला जातो. ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी पालिका प्रस्ताव मागविणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सण- उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात ईलेक्ट्राॅनिक साहित्याचा वापर होतो.
अनेकदा सणांवेळी नवीन साहित्य घेतल्यानंतर जुने साहित्य कचऱ्यात टाकून दिले जाते. यामुळे या काळात हा धोकादायक कचरा वाढतो. सध्या ई-कचरा व्यवस्थापनासाठी ठोस, नियमित यंत्रणा नसल्याने वाढत्या ई-कचऱ्याचे संकलन व शास्त्रोक्त विल्हेवाट हा पालिकेसमोरील महत्त्वाचा प्रश्न आहे. शहरात वर्षाला तब्बल ३ हजार टनांपेक्षा अधिक कचरा तयार होतो.
पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालये ठराविक कालावधीत व्ही-कलेक्ट ड्राइव्ह राबवितात. मोहिमेत नागरिकांकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू, उपकरणे आणि इतर ई-कचरा संकलित केला जातो. हा कचरा प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या माध्यमातून वैध परवाना प्राप्त अधिकृत रिसायकलरला सुपूर्द करण्यात येतो. शहरभर नियमितपणे ई-कचरा संकलित करण्यासाठी पालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा नसल्याने सध्या याच मोहिमांवरच अवलंबून राहावे लागते.
ई- कचऱ्यातील वस्तू
मोबाईल, स्मार्टफोन, टॅबलेट, संगणक, लॅपटॉप, मॉनिटर, की-बोर्ड, माऊस, टीव्ही, सेट-टॉप बॉक्स, प्रिंटर, स्कॅनर, फ्रीज, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, एसी, कूलर, चार्जर, अडॅप्टर, केबल, वायर, बॅटरी, हेडफोन, स्पीकर, कॅमेरा, स्मार्टवॉच, राऊटर, मोडेम, इलेक्ट्रॉनिक दिवे, सीएफएल, एलईडी उपकरणे.
गंभीर धोका
ई-कचरा नियमित कचऱ्यात मिसळल्यास पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. शहरात दररोज अनेक भागातून हा कचरा नियमित कचऱ्यात येत असल्याने कचरा प्रक्रियेतही अडथळे निर्माण होतात. मोबाईल, संगणक, टीव्ही, बॅटरी, चार्जर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये शिसे, पारा, कॅडमियम, क्रोमियम आदी घातक घटक असतात.
हा कचरा लँडफिलमध्ये गेल्यास या पदार्थांचे झिरपण होऊन माती, भूजल प्रदूषित होते. काही घटक जाळल्यास विषारी धूर व घातक वायू हवेत मिसळतात. त्यामुळे हवा, पाणी आणि मातीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याबरोबरच मानव, प्राणी आणि वनस्पतींच्या आरोग्यासाठीही धोका निर्माण होतो.






