Miri News : ई-केवायसीच्या तांत्रिक अडचणींमुळे कर्जमाफीचा लाभ रखडला! मिरी परिसरात सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी हैराण
Miri News : महाराष्ट्र शासनाच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.

Miri News : महाराष्ट्र शासनाच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र कर्जदार शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, ऑनलाइन पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि वारंवार सर्व्हर बंद पडत असल्याने अनेक शेतकरी अद्याप ई-केवायसी पूर्ण करू शकलेले नाहीत. परिणामी पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. (Miri News)
तालुक्यातील विविध सेतू केंद्रांवर सकाळपासून शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. दिवसभर पोर्टलवर मोठा ताण असल्याने सर्व्हर प्रतिसाद देत नसल्यामुळे सेतू केंद्र चालक रात्री उशिरा तसेच पहाटेपर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यावेळीही अनेक अर्जांमध्ये ‘फार्मर आयडी उपलब्ध नाही’ असा संदेश दिसत असल्याने प्रक्रिया पूर्ण होत नसल्याची समस्या कायम आहे. (Miri News)
काही शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी उपलब्ध असूनही पोर्टल त्याची नोंद स्वीकारत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तर काही प्रकरणांमध्ये कर्जदार आणि वारसदार यांच्या माहितीतील तफावत, तसेच कागदपत्रांतील विसंगतीमुळे ई-केवायसी रखडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने तांत्रिक त्रुटी दूर करून पोर्टल सुरळीत सुरू करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (Miri News)
“माझ्याकडे फार्मर आयडीसह सर्व आवश्यक माहिती उपलब्ध आहे. तरीही ‘फार्मर आयडी उपलब्ध नाही’ असा संदेश येत असल्याने ई-केवायसी पूर्ण होऊ शकलेली नाही.”
– सुदाम गाडेकर
शेतकरी, शिंगवे केशव“दिवसभर सर्व्हर प्रतिसाद देत नसल्याने शेतकऱ्यांचा लाभ अडकू नये म्हणून रात्री आणि पहाटेही ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, फार्मर आयडी संदर्भातील तांत्रिक त्रुटींमुळे काही शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण होत नाही.”
– रवींद्र सिंपणकर
सेतू केंद्र चालक, मिरी“जिल्हा बँकेकडील उपलब्ध माहितीच्या आधारे सेवा संस्थांमार्फत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. ई-केवायसी दरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी वरिष्ठ कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या असून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”
– गोकुळ नांगरे
सहाय्यक निबंधक, पाथर्डी“याबाबत सविस्तर माहिती घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.”
– प्रसाद मते
प्रांताधिकारी, पाथर्डी-शेवगाव उपविभाग





